गडचीरोली प्रतिनिधी/सतीश कुसराम
जिल्हयात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता व्यापारी वर्गाने व लोकप्रतिनिधींनी पुकारलेल्या जनता कर्फ्यूमधे सर्व नागरिकांनी उस्फुर्त सहभाग द्यावा असे आवाहन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. आत्तापर्यंत जिल्हयात कोरोनामूळे 15 मृत्यूंची नोंद झाली आहे. 17 जणांना तीव्र स्वरूपात लक्षणे असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. जिल्हयातील कोरोना बाधितांचा आकडा दोन हजारच्या वरती गेला आहे. सद्यस्थितीत त्यापैकी 538 रूग्ण सक्रिय आहेत. तसेच दैनंदिन स्वरूपातही मोठया संख्येने कोरोना बाधित आढळून येत आहेत. अशा परिसिथतीत सर्व जनता व लोकप्रतिनिधींनी यासाठी सहकार्य करणे आवश्यक आहे असे त्यांनी आवाहनात म्हटले आहे. कोरोना साखळी तोडण्यासाठी जनता कर्फ्यूला सर्व स्तरावर सहकार्य मिळणे अत्यंत आवश्यक आहे. व्यापारी संघटना तसेच लोकप्रतिनिधींनी गडचिरोली शहरात एकत्रित येवून पुकारलेल्या जनता कर्फ्यूला प्रत्येक नागरिकांनी सहकार्य करावे अशी विनंती आवाहनाद्वारे पालकमंत्री यांनी केली.
ते म्हणाले गरज असेल तरच घराबाहेर पडा. प्रशासनाकडून खबरदारीचे उपाय म्हणून दिलेल्या सूचनांचे पालन करा. यामध्ये मास्क लावणे, शाररिक आंतर राखणे, कोरोनाची लक्षणे असल्यास आरोग्य विभागाला संपर्क साधणे महत्वाचे आहे. जिल्हयातील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. यात नागरिकांच्या सहभागाशिवाय संसर्ग रोखणे शक्य नाही. त्याकरिता प्रत्येकाने दिलेल्या सूचनांचे पालन करून आपल्या बरोबर आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवा.
लोकांनी आपल्यासाठी शांततेच्या मार्गाने पुकारलेला हा बंद आहे. यामध्ये कोरोना रूग्ण शोधणे, कोरोना संसर्ग रोखणे तसेच त्यामूळे होणारे मृत्यू टाळणे असा उद्देश आहे. या प्रक्रियेत प्रशासनाला सहकार्य करून संभावित कोरोना बाधितांनी आपली माहिती द्यावी. जेणेकरून संसर्ग आटोक्यात ठेवण्यासाठी मदत होईल असे ते म्हणाले. तसेच माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेंतर्गत आलेल्या पथकाला सहकार्य करून आरोग्य विषयक माहिती द्या तसेच त्यांना तपासणीस सहकार्य करावे असे त्यांनी आवाहन केले आहे.