गडचिराेली : पावसाळ्याच्या दिवसात शहरासह अनेक ठिकाणच्या बाजारात रानभाज्या येतात. याच काळात शेतशिवारात आणि कुपकाटीत काटवल अर्थात करटाेली ही वेलवर्गीय फळभाजी आढळून येते. या भाजीला गडचिराेली शहरात सध्या चांगलीच मागणी आहे. त्यामुळे काटवलांनी भावाचा विक्रमी पल्ला गाठला आहे. काटवल ७० रुपये पाव, म्हणजे २८० रुपये किलाे अशा दराने विकले जात आहे.
पावसाळ्यात सर्वाधिक महाग मिळणारी भाजी म्हणजे मशरूम, अर्थात आळंबी. पण सध्या काटवलांनी एवढा भाव खाल्ला आहे की मशरूमही त्यांच्यासमोर स्वस्त वाटत आहे.
काटवलाची भाजी चविला थोडी कडवट असली तरी चविष्ट आहे. चविला हटके आणि आराेग्यदायी असलेल्या काटवल व कारल्याला नागरिकांकडून माेठी पसंती आहे. गडचिराेलीच्या बाजारात तालुक्यातील येवली, शिवणी, अमिर्झा भागातून शेतकरी काटवले घेऊन येतात. इंदिरा गांधी चाैकातही अनेक जण बसतात.
पोषक गुणधर्म
काटवलामध्ये प्राेटीन, आयर्न मुबलक असतात. याशिवाय फायबर व ॲन्टीॲाक्सिडंट मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे ही भाजी पचायला हलकी असते. पावसाळ्याच्या दिवसात इन्फेक्शनचा धाेका, बद्धकाेष्टता व पाेटाजवळील चरबी कमी करण्यासाठी काटवलाच्या भाजीचे सेवन करणे अतिशय फायदेशीर ठरते. यात शरीरामधील नको असलेले घातक घटक बाहेर टाकण्यासाठी मदत हाेते.