कोरोना साखळी खंडीत करण्यासाठी कॉन्टॅक्ट ट्रेसींग महत्त्वाचे
गडचीरोली प्रतिनिधी/सतीश कुसराम
कोरोना हा संसर्गजन्य आजार असल्याने तो संपर्कातील इतर व्यक्तिंना होतो. प्रत्येक कोरोना बाधिताने आपल्या संपर्कातील सर्व लोकांची योग्य माहिती आरोग्य विभागाला द्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी केले आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी संसर्ग साखळी खंडीत करावी लागते. यामध्ये रूग्णाचा शोध घेतल्यानंतर त्याच्या संपर्कातील तीव्र जोखमीचे व कमी जोखमीच्या लोकांचा शोध घेतला जातो. यादरम्यान कित्येक अनोळखी लोकांशी त्या जोखमीच्या लोकांचा संपर्क येण्याची शक्यता असते. त्यामुळे प्रत्येक कोरोना बाधिताने आपल्या संपर्कातील सर्व व्यक्तिंची माहिती आरोग्य विभागाला देणे आवश्यक आहे. याबाबत रूग्णाकडून चुकीची माहिती, दिशाभूल होणारी माहिती दिल्याने इतर अनेक लोकांना संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशी परिस्थिती निर्माण झाल्यामूळे संबंधित रूग्णावर साथरोग नियंत्रण कायद्यांतर्गत गुन्हयाची नोंद होवू शकते असे ते म्हणाले.
*कॉन्टॅक्ट ट्रेसींग महत्वाचे* : आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सद्या प्रत्येक रूग्णामागे साधारण १५ ते २० तीव्र जोखमीचे व्यक्ती शोधणे गरजेचे असते. या संख्येत कमी अधिक संपर्क संख्या राहू शकतात. परंतू कोरोना बाधित रुग्णांनी आपण भेटलेल्या वारंवारतेनूसार तीव्र व कमी तीव्र जोखमीच्या संपर्काची माहिती आरोग्य विभागाला द्यावी. यातून कॉन्टॅक्ट ट्रेसींग प्रक्रिया पुर्ण होत असते. कॉन्टॅक्ट ट्रेसींगमधील प्रत्येक व्यक्तीलाच विलगीकरणात रहावे लागते असे नाही. यातील तीव्र जोखमीच्या काही व्यक्तींना आरोग्य विभागाच्या सल्ल्यानुसार त्यांच्या घरात किंवा संस्थात्मक विलगिकरनात राहणे बंधनकारक असते. आरोग्य विभाग संबंधित व्यक्तीची कोरोना चाचणी करतात. त्यामध्ये अहवाल नकारात्मक आल्यानंतरही खबरदारी म्हणून पुढिल दोन ते तीन दिवस काळजी घेणे आवश्यक आहे. त्यानंतर संबंधित व्यक्ती सर्वसाधारणपणे वावरू शकतो. याच प्रकारे कमी जोखमीच्या लोकांनाही खबरदारी घेवून काही दिवस विलगीकरणात रहाणे आवश्यक असते.