गरंजी गावाला जोडणारा नवीन पूल मंजूर करण्याची आदिवासी बांधवांची मागणी
गडचीरोली जिल्हा संपादक/ प्रशांत शाहा
मुलचेरा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील व चामोर्शी तालुक्यातील रेगडी ग्रामपंचायत अंतर्गत रेगडी गावापासून १२ किलोमीटर अंतरावरील अतिदुर्गम गरंजी गावाला जोडणारा पूल पावसाच्या पाण्याने वाहून गेल्याने गरंजी येथील आदिवासी बांधवांचे जनजीवन विस्कळीत झाले असून आदिवासी बांधवांचा जनसंपर्क तुटला आहे.
मुलचेरा तालुक्यात समाविष्ट असलेले मात्र चामोर्शी तालुक्यांतर्गत येणाऱ्या रेगङी ग्रामपंचायतीत गरंजी या गावाचा समावेश होतो. स्वातंत्र्याच्या ६६ वर्षांनंतरही गरंजी गाव अंधारात होते. मात्र गरंजी गावचे तत्कालीन जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक विजय कारखेले यांच्या विशेष प्रयत्नाने गरंजी गाव स्वातंत्र्याच्या ६६ वर्षानंतर प्रथमच प्रकाशात आले व गावात विकासाची गंगा सुरू झाली.
गरंजी गावाला जोडणाऱ्या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे माञ रेगडी कसनसूर रस्ता ते गरंजी गाव यादरम्यान गरंजी गावाला जोडणारा मुख्य पूल वाहून गेल्याने गरंजी गावचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे.
गरंजी गावाला जोडणारा पूल तात्काळ मंजूर करण्यासंदर्भात गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, गडचिरोली जिल्हाधिकारी, खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी, यांच्यासह कार्यकारी अभियंता प्रधानमंत्री ग्रामसडक योजना गडचिरोली आदींना यासंदर्भात निवेदन देण्यात आले आहे.
पूल मंजूर करण्यासाठी दिलेल्या निवेदनावर संन्याशी हिचामी , लालाजी हिचामी,बाजीराव हिचामी, तुळशिराम नरोटे ,तुकाराम कंगाली ,किशोर हिचामी, मधुकर कांदो,भिमा गोटा,विनोद गोटा आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.