प्रितम गग्गुरी (अहेरी तालुका प्रतिनिधी)
आलापल्ली:- दि १५ जुलै २०२२ ला अहेरी येथील पोलीस मुख्यालय कार्यालयामध्ये पूरग्रस्तांच्या बचाव कार्यात सहकार्य केलेल्या योद्धांचा सत्कार कार्यक्रम घेण्यात आला. यात आलापल्ली येथील स्वराज्य फाउंडेशन आणि लाडका राजा गणेश मंडळातील योद्धांचा सत्कार करण्यात आला.
मागील आठवड्याभरापासून होत असलेल्या अतिवृष्टीचा फटका अहेरी उपविभागातील अनेक गावांना बसला आहे. यात काही लोकांना आपला जीव सुद्धा गमवावा लागला. अनेक लोकांच्या घरात पाणी शिरले. लोकांचे घर कोसळले. पाळीव प्राणी पुरात वाहून गेले. नागिरकांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले. अश्या भयावह परिस्थितीमध्ये लोक आपल्या परिवारासह घरीच सुरक्षित राहणे उचित समजत असतांना स्वराज्य फाउंडेशन आणि लाडका राजा गणेश मंडळाच्या सदस्यांनी मात्र मध्यरात्री त्या भयानक परिस्तिथीमध्ये नागरिकांच्या मदत करण्यासाठी धावले.
सदस्यांनी पहाटे ३.३० वाजेपासून लोकांना पुरातुन बाहेर काढण्यासाठी बचाव कार्य सुरू केले. त्या नंतर पुर्ण दिवस पूरग्रस्तांना मदत करत राहिले. पूरग्रस्तांना जेवणाची व्यवस्था स्वराज्य फाउंडेशन तर्फे करण्यात आली.
पूरग्रस्तांच्या मदतीला धावून आलेल्या योद्धांवर अहेरी उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांची नजर होती. त्यामुळे अशा योद्धांचा सत्कार करून त्यांच्यावर शाबासकीची थाप देणे हे कर्तव्य समजून त्यांनी या योद्धांचा सत्कार कार्यक्रम आज अहेरी उपविभागीय पोलीस विभागात आयोजित केला. यामध्ये स्वराज्य फाउंडेशन आणि लाडका राजा गणेश मंडळ यांच्या कार्याची दखल घेऊन मंडळाच्या सदस्यांचा सत्कार करण्यात आला.
स्वराज्य फाऊंडेशन आणि लाडका राजा गणेश मंडळ यांनी करत असलेले कार्य खूप अभिमानास्पद असून अश्या सामाजिक संस्थाची गरज पुन्हा आहे. त्यामुळे अशा संस्थेसोबत आणि मंडळासोबत पोलीस विभाग नेहमी राहील असे आश्वासन पोलीस उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिले. स्वराज्य फाउंडेशन आणि लाडका राजा गणेश मंडळ येथील सदस्यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी कडून करण्यात आलेला सत्कार आमच्यासाठी प्रेरणा देणारा असून सामाजिक बांधिलकी समजून काम पुढे सुद्धा करत राहतील असे सांगितले. स्वराज्य फाउंडेशन आणि लाडका राजा गणेश मंडळ आल्लापल्ली येथील सदस्यांचे समाजातून कौतुक होत आहे…