नागपूर येथील केंद्रावर गडचिरोलीतील 884 उमेदवारांची परिक्षा
गडचीरोली प्रतिनिधी/सतीश कुसराम
जिल्ह्यातील 884 उमेदवारांचे एमएचटी-सीईटी 2020 करिताचे परिक्षा केंद्र नागपूर जिल्ह्यात देण्यात आल्याने प्रशासनाकडून विशेष बसची व्यवस्था करण्यात आली आहे. दि. 01 ऑक्टोबर ते 09 ऑक्टोबर या पहिल्या टप्यात दोन शिफ्ट मध्ये ऑनलाईन स्वरुपात एमएचटी-सीईटी 2020 परिक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. उमेदवारांनी विशेष गाडयाच्या वेळापत्रकासाठी तसेच आवश्यक माहितीसाठी गडचिरोली येथील एस.टी.महामंडळाच्या कार्यालयात संपर्क करावा असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.
या प्रवासात उमेदवारांनी प्रवास खर्च स्वत: करायचा आहे. तसेच सोबत पालक असल्यास त्यांचाही खर्च स्वता:लाच करावा लागणार आहे. एस.टी. महामंडळाकडून फक्त विशेष बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. उमेदवारांनी या बसेसचा लाभ घेण्यासाठी सोबत परिक्षेचे ॲडमिट कार्ड सादर करणे आवश्यक आहे.
राज्याने महाराष्ट्र विनानुदानित व्यावसायिक शैक्षणिक संस्था (प्रवेश व शुल्क यांचे विनियमन) अधिनियम, 2015 अधिनियमांतर्गत सन 2020-21 या शैक्षणिक वर्षाकरिता अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, शेतकी, मत्स्य व दुग्ध इ. पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सामाईक प्रवेश परीक्षा 2020 (एमएचटी-सीईटी-2020) दि.01 ऑक्टोबर 2020 ते दि.20 ऑक्टोबर 2020 या कालावधीत संगणीकृत ऑनलाईन पद्धतीने परीक्षा आयुक्त, राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, मुंबई यांचेकडून आयोजित करण्यात आलेली आहे. अभियांत्रिकी, औषध निर्माणशास्त्र, शेतकी, मत्स्य व दुग्ध इ. प्रवेशासाठी शासनाच्यावतीने घेण्यात येणाऱ्या या प्रवेश परीक्षेला जिल्ह्यातील मोठ्या संख्येने उमेदवार आहेत. सदर परीक्षेसाठी सुमारे 5,41,548 विद्यार्थी राज्यभरातून बसणार आहेत.
या परिक्षेचा वेळ पहिल्या शिफ्ट करीता सकाळी 09 ते 12 वा.असून उमेदवारांनी सकाळी 7.00 वा. परिक्षा केंद्रावर उपस्थिती दाखविणे आवश्यक आहे. तसेच दुपारच्या सत्रातील परिक्षा ही 2.30 वा. ते 5.30 वा. असणार आहे. दुपारच्या सत्रातील उमेदवारांनी आपली उपस्थिती 12.30 वा. परिक्षा केंद्रावर दाखविणे आवश्यक आहे. जाताना तसेच येताना दोन्ही प्रवासासाठी बसेसची व्यवस्था करण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील परीक्षेबाबतची अद्यावत माहिती येत्या कालावधीत जाहीर करण्यात येणार आहे.
या प्रवासादरम्यान सर्व उमेदवारांनी कोरोना संसर्ग टाळण्यासाठी खबरदारीच्या उपाययोजना राबविणे आवश्यक आहे असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे.