गोंडपिपरी/ ग्रामीण प्रतिनिधी. शेखर बोंनगिरवार
अवघ्या काही दिवसातच खरीप पीक हातात येणार या आशेवर असलेल्या गोंडपिपरी तालुक्यातील शेतकऱ्यांची आता मात्र पुरती निराशा झाली असून वन्यजीवांच्या हैदोसामुळे तालुक्यातील उभे पीक जमीनदोस्त झाले आहे. इतके असताना देखील याकडे वनविभाग मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे.
गोंडपिपरी तालुका हा अतिशय दुर्गम भाग म्हणून ओळखला जातो. या तालुक्यात शेती व्यतिरिक्त कुठल्याही रोजगाराच्या संधी उपलब्ध नाही. त्यामुळे तालुक्यातील संपूर्ण जनता शेतीवर विसंबून आहे. कापूस, सोयाबीन, व भात शेती हे तालुक्यातील मुख्य पिके म्हणून गणल्या जातात.यंदा देशात कोरोनाचे संकट आले आणि याच संकटकाळात बी-बियाणांची जुळवाजुळव करून शेतकर्यांनी पेरणी केली.आता मात्र हे पिक काही दिवसातच हातात येणार या आशेवर शेतकरी होता. मात्र या हिरव्यागार दिसणार्या उभ्या पिकांवर वन्यजीव ताव मारण्यास सुरुवात केली आणि यामुळेच उभे पीक आता पुरते जमीनदोस्त झाले. हातात आलेले पिक डोळ्यादेखत जमीनदोस्त झालेले पाहून अनेक शेतकऱ्यांचे डोळे पाणावले असून शेतकरीवर्गात हळहळ व्यक्त केल्या जात आहे. अनेक शेतकऱ्यांनी कर्जबाजारी होऊन शेतात लाखो रुपये खर्च केले. आता मात्र शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती पूर्णता डबघाईस आली आहे. त्यामुळे या नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देण्यात यावी अशी मागणी तालुक्यात जोर धरत आहे.
—–
वन्य जीवांच्या हैदोस प्रकरणी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांशी याबाबत विचारणा केली असता या प्रकरणी वरिष्ठांना कळवू त्यानंतर आलेल्या जीआर नुसार वन्यजीवांचा बंदोबस्त करू असे वनविभागाचे कर्मचारी बोलले असल्याने आता पीक वाचविण्यासाठी काय करावे हा प्रश्न निर्माण झाला.
— स्वप्निल अनमुलवार,
भाजपा कार्यकर्ता धाबा.