चंद्रपूर : बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 नुसार अनाथ, सोडून दिलेले व परित्यागित बालकांचे दत्तक आदेश तसेच नात्यांतर्गत दत्तक व सावत्र दत्तक करण्याकरिता नियमावली 2022 तयार करण्यात आली आहे. त्यानुसार हे आदेश पारित करण्याची जबाबदारी आता जिल्हाधिकार्यांना देण्यात आली असून, चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी काल शुक्रवार, 6 जानेवारी रोजी जिल्ह्यातील पहिला दत्तक आदेश परित केला आणि एका चिमुकल्याला आई-वडील मिळाले.
इच्छूक पालक गिरीश गोविंदराव रणदिवे आणि भावना गिरीश रणदिवे यांच्याकडे दत्तक बालकास देण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकार्यांनी पारित केले. या दत्तक आदेशानुसार गिरीश आणि भावना रणदिवे हे या बालकाचे आई-वडील झाले आहेत.
हे आदेश पारित करण्याकरिता जिल्हा महिला व बालविकास अधिकारी दीपक बानाईत, जिल्हा परिविक्षा अधिकारी महेश हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय साखरकर, विधी तथा परिविक्षा अधिकारी सचिंद्र नाईक, किलबिल दत्तक संस्थेचे हेमंत कोठारे यांनी अर्ज प्रक्रिया पूर्ण केली.
बालकल्याण समिती चंद्रपूर यांच्या आदेशान्वये किलबील या दत्तक संस्थेत अनाथ, सोडून दिलेले व परित्यागित बालकांना दाखल करण्यात येते.दत्तक इच्छुक पालक नोंदणी करून बालकास पालकांनी राखीव केल्यानंतर दत्तक समितीद्वारे पालकांची मुलाखत घेऊन दत्तक आदेशकरिता जिल्हाधिकार्यांकडे अर्ज करण्यात येते.