नागपूर -भारताचे संविधान आम्ही भारताच्या लोकांनी दि. 26 नोव्हेंबर 1949 रोजी अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण केले. हा दिवस संपूर्ण देशभर ‘सविधान दिन’ म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा केला जात असून संविधानाची मूलभूत तत्वे, मूल्ये व विचार सर्वसामान्यांपर्यंत, तळागाळापर्यंत, देशातील प्रत्येक नागरिकाच्या मना-मनात आणि घरा-घरात पोहोचविण्यासाठी ‘खूप लढलो बेकीने, आता लढूया एकीनेच’ या युवकांच्या टीमच्या पुढाकाराने व संविधान फाऊंडेशन सह
नागपूर शहरातील विविध सामाजिक संघटनांच्या संयुक्त सहभागाने नागपुरात अण्णाभाऊ साठे चौक, दीक्षाभूमी ते संविधान चौक नागपूर ‘वाॅक फाॅर संविधान’चे आयोजन करण्यात आले होते. या ‘वाॅकथान’चा शुभारंभ अण्णाभाऊ साठे चौक नागपूर येथून विभागीय आयुक्त श्रीमती विजयालक्ष्मी प्रसन्ना बिदरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नागपूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. विपिन ईटनकर, आयकर विभागाचे अतिरिक्त आयुक्त धनंजय वंजारी, प्रसिद्ध मेंदूरोग तज्ञ डॉ. चंद्रशेखर मेश्राम, समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिद्धार्थ गायकवाड व संविधान फाऊंडेशनचे संयोजक डॉ. महेंद्रकुमार मेश्राम, दीपक निरंजन व अतुलकुमार खोब्रागडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ‘वाॅक फाॅर संविधान’ मध्ये नागपूर महानगरातील हजारो नागरिकांसह शासकीय-निम शासकीय कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी, शाळा, महाविद्यालयाचे, विद्यापीठाचे विद्यार्थी-प्राध्यापक-शिक्षक, सामाजिक संस्था व संघटनांचे पदाधिकारी तथा कार्यकर्ते, महिला व युवक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. प्रारंभी सविधान फाऊंडेशनचे संयोजक डॉ. महेंद्रकुमार मेश्राम यांनी संविधान प्रास्ताविकेचे वाचन केले.
‘संविधानाच्या सन्मानासाठी दोन किलोमीटर चालूया’ या आयोजकांच्या आवाहनाला प्रतिसाद देत संविधानाप्रति निष्ठा व आदर ठेवणाऱ्या हजारो नागपूरकरांनी ‘संविधान दिन चिरायू हो’, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो’, ‘उठ नागरिका जागा हो, संविधानाचा धागा हो’ असा गगनभेदी जयघोष करत भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी संविधान चौकाकडे चालू लागले.
संविधान चौक, नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला ज्येष्ठ कवी इ. मो. नारनवरे, डॉ. चंद्रशेखर मेश्राम, डॉ. महेंद्रकुमार मेश्राम, सकाळचे शहर संपादक प्रमोद काळबांडे, माजी शिक्षणाधिकारी निर्गुन्शा ठमके, दीपक निरंजन, दिगंबर गोंडाने, अतुलकुमार खोब्रागडे यांच्या प्रमुख उपस्थितीत माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी संविधान प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन केले. संविधानाच्या सन्मानासाठी गीतगायन, काव्यवाचन, नाटिकांचे सादरीकरण करण्यात आले. संविधान दिनाच्या निमित्ताने आयोजित ‘वाॅक फाॅर संविधान’चा समारोपीय कार्यक्रम संविधान चौकात उत्साहात संपन्न झाला. समारोपीय कार्यक्रमाच्या निमित्ताने आयोजित
सांस्कृतिक कार्यक्रमात शाळा- महाविद्यालयाचे विद्यार्थी महापुरुषांच्या वेशभूषांमध्ये सहभागी होत संविधानाची तत्वे व मूल्यांचा जागर करू लागले. यावेळी विविध स्पर्धांच्या विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. ‘वॉक फॉर सविधान’ची सांगता राष्ट्रगीताने झाली. कार्यक्रमाची भूमिका अतुलकुमार खोब्रागडे यांनी मांडली. सूत्रसंचालन वैशाली गोस्वामी यांनी केले तर प्रशांत बेले यांनी आभार मानले.
‘वॉक फॉर सविधान’च्या यशस्वीतेसाठी आनंद मनवर, संदीप बेलेकर, निखिल रामटेके, दिपांकर दुपारे, विक्रम बोरकर, मंगेश नागदेवे, रोशन जांभूळकर, योगेश टेंभुर्णे, वैशाली गोस्वामी, विना मनवर, पल्लवी आटे वानखेडे, मयुरी माटे, काजल गणवीर, राहुल सोनवणे, सोनू बहादे, अथांग क-हाडे, अभिजीत मेश्राम, कैलाश खोब्रागडे व अमोल रंगारी यांनी अथक परिश्रम घेतले.
***********