गडचिरोली :- गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी तालुक्यात गेल्या आठ महिन्यात वाघांच्या हल्ल्यात अनेक लोकांचा बळी गेला आहे. यात आता आणखी एकाची भर पडली आहे.
मशरूमसाठी जंगलात जाणे तरुणाच्या जीवावर बेतले आहे. वाघाने झडप घालून फरफटत नेत त्याला ठार केल्याची धक्कादायक घटना घडली. ही घटना गडचिरोली जिल्ह्यातील उसेगावला लागूनच जंगल असल्याने अगदी 2 किमी अंतरावर घडली. काय आहे संपूर्ण घटना – प्रेमलाल प्रधान (वय-44) रा.
उसेगाव असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. आज गुरुवारी ही घटना घडली. देसाईगंजपासून 10 किमी अंतरावर उसेगाव आहे. या उसेगाव येथील प्रेमलाल प्रधान आणि वासुदेव झोडे (वय-32) हे दोघेही गुरुवारी सकाळी 7 वाजता गावाला लागूनच असलेल्या जंगलात अळंबी (मशरूम) गोळा करण्यासाठी गेले होते.
दोघेही जवळपास राहूनच अळंबी शोधत होते. याचवेळी सकाळी साडेसात वाजेच्या दरम्यान, दबा धरून बसलेल्या वाघाने प्रेमलाल प्रधान याच्यावर झेप घेतली तसेच त्याला फरफटत नेत ठार केले. तर दुसरीकडे वाघाने हल्ला केल्यावर सोबती वासुदेव झाडे भयभीत झाला आणि त्याने घटनास्थरावरून पळ काढला. तसेच गावात पोहोचून नागरिकांना या घटनेची माहिती दिली.
त्यानंतर नागरिकांनी हा घडलेल्या प्रकाराबाबत वनविभागाला कळविले. तसेच वनविभागाचे वनपरिक्षेत्राधिकारी चव्हाण, विजय धांडे, के. वाय. कऱ्हाडे, वनरक्षक सलीम सयद हे काही वेळेतच घटनास्थळी दाखल झाले.
मात्र, यावेळी याठिकाणी काहीच आढळले नाही. यानंतर परिसरात शोधमोहीम सुरू करण्यात आली. तर घटनास्थळापासून 300 मीटर अंतरावर प्रेमलालचा मृतदेह आढळून आला. यावेळी वाघाने प्रेमलालच्या छाती व मानेचा भाग खाल्ल्याचे दिसले.
यानंतर वनाधिकाऱ्यांनी पंचनामा करीत मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणी आणि शवविच्छेदनासाठी पाठविला. दरम्यान, प्रधान कुटुंबाला वन विभागाने 25 हजार रुपयांची तातडीची आर्थिक मदत दिली आहे. हेही गडचिरोली : वाघाच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू, सरपण गोळा करायला गेला अन्… 4 सप्टेंबरला दिली दवंडी – कोंढाळा परिसरात वाघाचा वावर आहे. तो ट्रॅप कॅमेऱ्यात अधूनमधून कैद होत आहे.
त्यामुळे वनविभागाने नागरिकांनी जंगलात जाऊ नये, अशी दवंडी 4 सप्टेंबरला परिसरातील गावांमध्ये दिली होती. मात्र, तरीही उसेगाव येथील दोन जण जंगलात गेले. यापूर्वीही याच जंगलात वाघाने दोन जणांना ठार केले होते. त्यानंतर आता पुन्हा वाघाच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला.