ब्युरोचीफ प्रशांत शाहा
गडचिरोली-मूलचेरा: मूलचेरा तालुक्यातील गरंजी हे गाव चामोर्शी तालुक्यातील रेगडी या गावापासून सुमारे बारा किमी अंतरावर आहे.महाराष्ट्र छत्तीसगड राज्य मार्गावरून सुमारे दोन किमी अंतरावर गरंजी हे गाव आहे.
शासनाने या गावात जाण्याकरिता मुख्यमंत्री सडक योजने अंतर्गत रस्ता तर बांधला पण या दोन किमीच्या प्रवासात एक जुना पूल आहे मागील चार वर्षा पूर्वी हा पूल वाहून गेला. त्यानंतर हा पूल सार्वजनिक बांधकाम विभाग चामोर्शी अंतर्गत दुरुस्त करण्यात आला होता. मात्र मागील वर्षी अतिवृष्टीमुळे हा पूल वाहून गेला आहे; त्यामुळे ग्रामस्थांचे मोठे हाल होत आहेत.
मागील वर्षी रस्त्याचे काम पूर्ण झाले पण पुलाचा प्रश्न मात्र प्रलंबित राहिला.
गरंजी येथील ग्रामस्थ सध्या पूल कधी होईल याची प्रतीक्षा करत आहेत. शासन दरवर्षी आदिवासींच्या विकासासाठी कोट्यावधी रुपये खर्च करत आहे; मात्र गरंजी येथील ग्रामस्थांना पक्का पूल देण्यासाठी मात्र टाळाटाळ होत असल्याचे दिसत आहे. ग्रामस्थांना गावात चार चाकी गाडी नेता येत नाही त्यामुळे सदर नदीतून पायी प्रवास करून गाव गाठावे लागते. याच रस्त्याने शाळेचे विद्यार्थी सुद्धा ये-जा करतात त्यामुळे हा पूल खचल्याने मोठा त्रास सहन करावा लागत आहे. साहेब आम्हाला रस्ता दिला पण पक्का पूल कधी देणार? असा संतप्त सवाल गरंजी येथील ग्रामस्थ विचारत आहेत.
तरी शासनाने हा पुल लवकरात लवकर बांधवा अशी मागणी गरंजी येथील तुकाराम कंगाली, संन्याशी हिचामी, लालाजी हिचामी, रावजी नरोटे, किशोर हिचामी, बाजीराव हिचामी, आदी ग्रामस्थांनी केली आहे.