गडचिरोली जिल्ह्यातील जनतेची भावना चंद्रपूर पाठोपाठ गडचिरोली ची दारूबंदी उठली पाहिजे – ना. विजय वडेट्टीवार

986

गडचिरोली / प्रतिनिधी:

चंद्रपूर जिल्ह्याची दारूबंदी तब्बल ६ वर्षांनी उठविल्यानंतर आता लगतच्या गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्यासाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. चंद्रपूर येथील दारूबंदी उठविण्याची घोषणा होताच नागरिकांनी आनंद व्यक्त केला. त्याच पार्श्वभिमूवर गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्यासाठी जनतेच्या भावना लक्षात घेऊन राज्याचे आपत्ती आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी शनिवारी दारूबंदी उठवू अशी माहिती दिली.

गडचिरोली दौऱ्यावर आले असता त्यांनी संवाद साधला. दारूबंदी करताना जे उद्देश ठेवण्यात आले होते, ते पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. तरीसुध्दा जिल्ह्यातील काही तथाकथित समाजसेवक स्वार्थापोटी दारूबंदीचे समर्थन करतात. मात्र, त्यांच्या मागे येथील नागरिकांचे समर्थन नाही, असं ते म्हणाले. समाजसेवक डॉ. अभय बंग यांच्यावर त्यांनी अप्रत्यक्ष टीका केली.

सोबतच गडचिरोलीतील लोकप्रतिनिधी आणि सर्वसामान्य जनता दारूबंदीच्या विरोधात असून पालकमंत्र्यांनी या संदर्भात बैठक घेऊन समीक्षा समिती स्थापन करण्याबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.