चंद्रपूर:मुंबईतील सावित्रीबाई फुले वसतीगृहात अभियांत्रीकीचे शिक्षण घेणाऱ्या मुलीची अत्याचारानंतर निर्घृण हत्येच्या दुर्देवी घटनेनंतर राज्यातील सर्व शासकीय अभियांत्रकी महाविद्यालयातील मुलींच्या वसतीगृहाच्या पाहणीचे आदेश देण्यात आले आहेत. चंद्रपूरातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील मुलींच्या वसतीगृहाची पाहणी पोलिस अधिकारी व महाविद्यालयाच्या संयुक्त समितीने केली. तसेच यासंदर्भातील अहवाल शासनाला पाठविण्यात आला आहे.
अकोला येथील रहिवासी असलेली मुलगी मुंबईत अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होती. सावित्रीबाई फुले वसतगृहात ती वास्तव्याला होती. तिथे तिच्यावर अत्याचार झाला त्यानंतर निर्घृण हत्या करण्यात आली. या दुर्देवी घटनेचे संपूर्ण राज्यात पडसात पडले आहेत. दरम्यान उच्च व तंत्रशिक्षण विभागाने या घटनेनंतर राज्यातील सर्व अभियांत्रिकी महाविद्यालयातील मुलींचे वसतीगृहाची पाहणी करण्याचे आदेश निर्गमीत केले आहे. या आदेशानुसार आज शुक्रवार पासून शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात मुलींच्या वसतीगृहाची पाहणी संयुक्त समितीव्दारे केली जात आहे. चंद्रपूरच्या शासकय अभियांत्रिकी महाविद्यालयात पोलिस अधिकारी लांबट, दोन महिला पोलिस अधिकारी तथा शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य सुदर्शन बुटले, प्रा,राजेश पेचे, प्रा,पाटील, मुलांच्या वसतीगृहाचे निरीक्षक लोकेश निखाते व मुलींच्या वसतीगृहाचे निरीक्षक प्रा.रेखा चहारे यांच्या समितीने वसतीगृहाची पाहणी केली. या पाहणीत मुलींच्या वसतीगृहात दोन ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्याची सूचना समितीने केली आहे. तसेच वसतीगृहाला संरक्षण भिंत करण्याची सूचना देखील या समितीने केली आहे. ही समिती आता दर तीन महिन्यांनी वसतीगृहाची पाहणी करणार आहे. वसतीगृहात वास्तव्याला असलेल्या मुलींची नोंद, त्यांचे आधार कार्ड, स्थायी पत्ता, मोबाईल नंबर यासोबतच वसतीगृह सोडतांना त्यांना कुठे जात आहे याचे कारण सांगावे लागणार आहे. केवळ मुलींच्याच नाही तर मुलांच्या वसतीगृहाची देखील पाहणी यावेळी केली गेली. दरम्यान या समितीने खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयातील वसतीगृहाची देखील पाहणी करावी अशीही सूचना समोर आली आहे. या समितीने वसतीगृहाची पाहणी केल्यानंतर तात्काळ अहवाल शासनाला पाठविला आहे.






