गोंडपीपरी:-
गोंडपीपरी तालुक्यातील सकमुर (चेकबापूर) गावात ओबीसी जनगणनेच्या जनजागृतीसाठी तीन दिवसांत १५० घरांवर पाट्या लावल्या गेल्या आहेत. गावातील तरुण मंडळी पुढे येऊन ओबीसी जनगणना जनजागृती आणि पाटी लावा मोहिम गावात राबविली.
गेल्या नव्वद वर्षापासून ओबीसी प्रवर्गाची जातनिहाय जनगणना झाली नाही. सन १९३१ नंतर भारतात ओबीसी जनगणना झाली नसून, ओबीसी समाजाची अधिकृत आकडेवारी आजपर्यंत कळली नाही आणि त्यामुळे ओबीसी समाज हा शासन दरबारी वंचित आहे. ओबीसी समाज हा भारताच्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत ५० ते ६० टक्के असूनही भारतीय व्यवस्थेच्या प्रत्यक्ष कार्यप्रणाली मध्ये सहभागी करुन घेतले जात नाही.
ओबीसी प्रवर्गाची जनगणना झालीच तर शासनाच्या विविध योजना, विभागीय कार्यालय उदाहरणार्थ शैक्षणिक, औद्योगिक, आर्थिक, सामाजिक, राजकीय याठिकाणी हक्क अधिकार देणे क्रमप्राप्त ठरते. म्हणून ओबीसी जनगणना होणे आवश्यक आहे. यासाठीच सकमुरातील तरुण मंडळीने पुढाकार घेऊन पाटी लावा मोहीम सुरू केली होती.
यांत संदीप पिपरे, प्रणय काळे, सुरज काळे, सुरज दहागावकर, सुरज मुत्येमवार, प्रशांत मुत्येमवार, श्रीकांत सांगडे, शुभम चिताडे, वैभव कुचुलवार, निखिल चनकापुरे, नितेश जुनघरे, राहुल तेलजीलवार, बाल्या तांगडे, धनराज तांगडे, प्रशांत तांगडे, बबन कोरडे, सुरेंद्र काळे, रुपेश गिरसावळे तसेच गावातील इतर तरुणांनी, गावातील नागरिकांनी सहकार्य करून ही मोहीम यशस्वी केली..