थकित भत्ता देण्याची शेतकऱ्यांची मागणी
गोंडपिपरी / शेखर बोनगीरवार
पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वर्षाकाठी सहा हजार रुपये देण्यात येणार अशी घोषणा खुद्द देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली. घोषणेनुसार मागील वर्षापासून अनेक शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्याने दोन दोन हजार रुपये याप्रमाणे लाभार्थ्यांच्या खात्यात टाकण्यात आले. यानंतर मात्र ही रक्कम मिळणेच बंद झाल्याने किसान सन्मान निधी ला ब्रेक लागला की काय असा प्रश्न शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाला आहे.
पंतप्रधान किसान सन्मान योजना अंतर्गत मिळणारे अनुदाना मुळे शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य होत होते. अनेक शेतकऱ्यांना दोन तीन टप्प्यात निधी प्राप्त झाला यानंतर मात्र या योजनेअंतर्गत मिळणारा निधी पूर्णतः बंद झाल्याने शेतकरीवर्गात संताप व्यक्त होत आहे.काही शेतकऱ्यांना दोन दोन हप्ते निधी प्राप्त झाला यानंतर मात्र त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणे बंद झाले मात्र याबाबत चौकशी केल्यानंतर काही लाभार्थ्यांच्या आधार लिंक मध्ये त्रुटी असल्याचे समजते तर काहींच्या खात्यातील रक्कम दुसऱ्याच्या खात्यामध्ये जमा होत असल्याचे कळते. त्यामुळे योजनेबाबत संबंधित प्रशासनाचा गलथानपणा स्पष्ट दिसून येत आहे. एक दोनदा निधी जमा झाल्यानंतर त्रुटी निर्माण होतात कशा हा प्रश्न आता शेतकऱ्यांपुढे उभा आहे संबंधित प्रशासन हा ऑनलाइन भरलेला डाटा फेरफार करीत असल्याची शंका शेतकरीवर्गात सुरू आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी ही शेतकऱ्यांसाठी वरदान ठरली आहे.आर्थिक दुष्काळात एक आशेचा किरण म्हणून या निधिकडे बघितल्या जाते,परंतु हा आशेचा किरणही आता लुकलुकणार्या तार्यागत झालेला आहे.योजनेशी संबंधितांनी लक्ष देऊन लवकरात लवकर सदर निधीचा लाभ मिळवून द्यावे अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
——-
आम्ही फक्त डाटा अपलोड करतो,ऑनलाइन पोर्टलवर माहिती पीडीएफ करतो, आम्ही निधी जमा करीत नाही.निधी जमा होणे न होणे हे वरील यंत्रणेचा भाग आहे. काही लाभार्थ्यांचे चार ते पाच हप्तेही जमा झाले आहेत आणि काही लाभार्थ्यांची निधी टप्प्याटप्प्याने जमा होईल.
*तहसीलदार तालुका गोंडपिंपरी*– सीमा गजभिये