नागेश इटेकर,प्रतिनिधी
अहेरी: तालुक्यातील मौजा बोरी गावातील सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्यांचे पूर्णतः पोस्टमार्टम झाले असुन गावातील नाल्या तुटलेल्या आणि मातीने बुजुन गेल्या आहेत. त्यांची डागडूजी तर नाहीच पण सफाई विना नाल्या चिखलाने आणि मातीने तुडुंब भरलेल्या अवस्थेत आहेत. तरी देखील ग्राम पंचायतचे पदाधिकारी जे जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी झटनार असे आश्वासन देऊन निवडून आलेले आता मात्र आंधळ्याचे सोंग घेवून बसले आहेत.गावातील सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्यांची कित्येक वर्षांपासून साफसफाई करण्यात आली नाही.त्यामुळे गावातील नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
ग्रा.प. बोरी अंतर्गत गावातील नाल्या कित्येक वर्षापासून बूजलेल्या अवस्थेत असल्यामुळे पावसाळ्यात यानाल्या ओव्हरफ्लो होऊन रस्त्यांवरून वाहत सुटणार असे चित्र दिसणार आहे.खास करून पावसाळ्यात या नाल्यांना वाहण्यासाठी रस्त्याचा आधार घ्यावा लागेल हे मात्र नक्की. नाल्यांमधील दुषित पाणी रस्त्यावर येत असेल तर तेथील वातावरण प्रदुषित होऊन गावात रोगराई पसरण्याची शक्यता नाकारता येणार नाही. म्हणुन उचित वेळेवर गावातील नाल्यांची सफाई होणे आवश्यक आहे.परंतु जनतेप्रती उदासीन धोरण स्वीकारलेल्या ग्रामपंचायतकडून सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्याची अद्यापही सफाईचे काम हाती घेतले नाही.मात्र नाल्या सफाईसाठी दरवर्षी लाखो रुपये ग्रामपंचायत प्रशासनाकडून खर्च केले जातात. गावात कित्येक वर्ष लोटूनही अद्याप नालीसफाई आणि डागडुजीचे काम करण्यात आले नाही,नाल्या कचऱ्याने तुडुंब भरल्या आहेत.त्यामुळे नाल्यांमधील सांडपाण्याला मार्गच उरलेला नसल्याने पावसाळ्याच्या दिवसात नाल्यातील दुषित पाणी रस्त्यावरून वाहत असतो. त्यामुळे गावात जलजन्य, साथीचे आजार बळविण्याची दाट शक्यता असते.विशेषतः हे आजार पावसाळ्याच्या दिवसात भेडसावत मग अशा वेळेस साथीचे आजार पसरून जीवित हानी झाली तर याची जबाबदारी ग्रामपंचायत प्रशासन घेईल का?असा सवाल स्थानिक गावकऱ्यांनी उपस्थित केला आहे.
तालुक्यातील काही ग्राम पंचायत स्तरावर मान्सूनपूर्व नालेसफाई, रस्त्याची कामे ग्रामपंचायत प्रशासनाकडून करण्यास सुरुवात झाली परंतु या कामात सातत्य नसल्याचे दिसून आले.सुदृढ आरोग्यासाठी साफ सफाईला आरोग्य विभागाकडून प्राधान्य दिले जाते मात्र बोरी ग्रामपंचायतमध्ये तसे तारतम्य दिसून येत नाही.आत्तापर्यंत तर नाहीच पण पावसाळ्याच्या दिवसात गावातील आरोग्य अबाधित राहील यादृष्टीने गावातील नालीसफाई होणे गरजेचे आहे. गावातील नाल्यांमधील घाण साफ करण्यासाठी गावकरी वारंवार पाठपुरावा करीत आहेत.परंतु ग्राम पंचायत याकडे लक्ष देत नाही असा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.
गावातील काही भागात पावसाच्या दोन सरीतच दरवर्षी या नाल्यातून पाणी रस्त्यावर वाहते. याचे हे मुख्य कारण दर्जाहीन आणि अरुंद व ओबडधोबड पद्धतीने बांधलेली नाली व रस्ते आहेत. या नाल्याची साफसफाई होणे गरजेचे आहे. परंतु, ग्रामपंचायत प्रशासन याकडे गांभीर्याने पाहत नसल्याचे चित्र आहे. गावातील नाल्याची दुरावस्था झाली असून नाल्या साफ नसल्याने त्या ठिकानातून सांडपाणी तुंबते याचा त्रास गावकऱ्यांना खास करून पावसाळ्यात सहन करावा लागतो.यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने वेळीच सतर्क राहून गावातील कचऱ्याने तुंबलेल्या नाल्याची लवकरात लवकर साफसफाई करावी अशी मागणी होत आहे.