बळीराम काळे, जिवती
जिवती (ता. प्र.) : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अधिनियम २००५ महाराष्ट्र राज्य सामाजिक अंकेक्षण व पारदर्शकता सोसायटी मंत्रालय मुंबई द्वारा २० नोव्हेंबर २०२३ ते १३ डिसेंबर २०२३ पर्यंत जिवती तालुक्यातील ३६ ग्रामपंचायत स्तरावर मनरेगाचे सामाजिक अंकेक्षण करण्यात आले. सदर सामाजिक अंकेक्षणात प्रत्येक ग्राम पंचायतस्तरावर सात दिवस निवासी राहून मनरेगाच्या कामाची पाहणी, मजुराच्या खात्यात त्यांची मजुरी जमा झाली का ? याची पाहणी, मस्टर, बिल, फाईल इत्यादी इतंभुत कागदपत्राची तपासणी करण्यात आली. आणि आठव्या दिवशी ग्रामसभा घेऊन यातील त्रुटीबाबत चर्चा करण्यात आली.
ज्या तृट्या ग्रामसभेत पुर्ण झाल्या नाहीत. अशा निघालेल्या विविध मुद्यांवर वाचन करून त्यावर चर्चा व निर्णयासाठी पंचायत समिती जिवती येथे जनसुनावणी घेण्यात आली. सदर जनसुनावणी तक्रार निवारण अधिकारी, ज्ञानेश्वर सपाटे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. याप्रसंगी गट विकास अधिकारी डॉ.भागवत रेगीवाड, जिल्हा साधन व्यक्ती, निलेश राऊत, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी, निलेश चांदेकर, पत्रकार प्रतिनिधी, दिपक साबने, मजूर प्रतिनिधी, सामाजिक संस्था प्रतिनिधी, तसेच तांत्रिक सहाय्यक, अंबादास पवार, जगनाडे व तालुक्यातील सरपंच, ग्रामसेवक व ग्राम रोजगारसेवक आदी उपस्थित होते.