बळीराम काळे, जिवती
जिवती (ता.प्र.) : मागील ६५ वर्षांपासून पहाडावरील आपल्या ताब्यात असलेली जमीन कसून येथील शेतकरी वर्ग आपला व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत. मात्र अद्यापपर्यंत कोणत्याही राजकीय पुढाऱ्यांनी हे गंभीर विषय मार्गी लावलेले नाही. म्हणून जिवती तालुक्यातील विविध पक्षांचे, विविध संघटनांचे, विविध जाती धर्माचे नऊ तरुण एकत्र येत जिवती तालुका भूमिहीन शेतकरी बचाव संघर्ष समितीतर्फे तीन पिढ्यांची अट रद्द करून ताब्यात असलेल्या जमिनीचे पट्टे देण्यात यावे, संगणक परिचालकांना सुधारित आकृतीबंधात घेऊन किमान वेतन देण्यात यावे यासह अनेक मागण्या घेऊन ७ डिसेंबर पासून अन्नत्याग आमरण उपोषण सुरू आहे. आंदोलनाचा आज चौथा दिवस असून आंदोलनकर्त्यांची तब्येत खालावत आहे.
सुरू असलेल्या अन्नत्याग आमरण उपोषणाला आज जिवती येथील बाजारपेठा कडकडीत बंद ठेऊन पाळण्यात आले. संगणक परिचालक संघटना, गोरसेना यासह अनेक संघटनांनी जाहीर पाठिंबा दर्शविला. आज जिवती येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून तालुक्यातील शेतकरी, भूमिहीनांनी शेकडोच्या संख्येत आंदोलनस्थळापर्यंत रॅली काढून समर्थन दिले. याप्रसंगी भूमिहीन शेतकऱ्यांना जमिनीचे पट्टे मिळालेच पाहिजे, जय जवान जय किसान, शेतकरी एकता जिंदाबाद अशा नाऱ्यानी शहर दुमदुमले होते. आंदोलनस्थळी रॅलीचे सभेत रूपांतर झाले. जवळपास दोन ते तीन तास वाहतूक विस्कळित झाली होती.
– शेवटचा लढा शेतकरी मायबापासाठी लढू आणि जिंकू. मागण्या मान्य नाही झाल्या तर दोन दिवसानंतर पानित्याग आंदोलन सुरू करणार असल्याची सुग्रीव गोतावळे, सुदाम राठोड, लक्ष्मण मंगाम, विजय गोतावळे, शबीर जहागीरदार, विनोद पवार, प्रेम चव्हाण, मुकेश चव्हाण, दयानंद राठोड या उपोषण कर्त्याची भूमिका आहे.
– आमदार सुभाष धोटे, उपविभागीय अधिकारी, रवी माने, तहसीलदार अविनाश शेंबटवाड यांनी आंदोलन कर्त्यासोबत चर्चा केली परंतु आंदोलनकर्ते आंदोलनावर ठाम आहेत.