नागपूर – भारतीय संविधान ‘आम्ही भारताच्या लोकांनी’ दि. 26 नोव्हेंबर 1949 रोजी अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण केले. संविधानाची मूलभूत तत्वे प्रत्येक नागरिकांस संस्कारीत करणारी आहेत. संविधानातील मूलभूत गोष्टी या माणसाच्या प्रतिष्ठापूर्वक जगण्याशी व विकसित अस्तित्वाशी अत्यंत निगडित आहेत. भारतीय संविधान हे राष्ट्रीय एकात्मता व बंधुतेचे तथा देशाच्या संपन्नतेचे जगातील अत्यंत सुंदर असे राष्ट्रग्रंथ आहे. संविधानाचे विचार ‘मना-मनात’ रुजवीने व ‘घरा-घरात’ पोहोचविणे काळाची नितांत गरज आहे.
सन 2005 मध्ये, माजी सनदी अधिकारी इ. झेड. खोब्रागडे, नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असताना, संविधानाची ओळख शालेय जीवनापासूनच मुला-मुलींना व्हावी म्हणून त्यांनी सुरू केलेला, प्रत्येक शाळांमधून दररोज भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचनाचा ‘संविधान ओळख’ व ’26 नोव्हेंबर-संविधान दिन’ उपक्रम पुढे राज्यभर विस्तारित झाला. महाराष्ट्र शासनाने ’26 नोव्हेंबर’ हा दिवस ‘संविधान दिन’ म्हणून घोषित करून संविधानाच्या जाणीव-जागृतीसाठी कृती कार्यक्रम निर्देशित केला. सन 2015 पासून केंद्र शासनाने ’26 नोव्हेंबर’ हा दिवस ‘संविधान दिन’ म्हणून देशभर साजरा करण्याचा निर्णय घेतला असून आता देशभर विविध पातळीवर संविधान जागराचे कार्यक्रम होत आहेत. 2023 ते 2025 या संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षात संविधानाचे मौलिक विचार देशातील सर्व नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘घर घर संविधान’ अभियान राबविणे अत्यंत आवश्यक आहे.
‘युवा ग्रॅज्युएट फोरम’ या युवकांच्या टीमच्या पुढाकारातून व संविधान फाऊंडेशन सह सर्व सामाजिक संघटनांच्या संयुक्त सहभागातून संविधान दिनाच्या निमित्ताने दि. 26 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 7.00 वा. नागपूर शहरात अण्णाभाऊ साठे चौक (दीक्षाभूमी) ते संविधान चौक ‘वाॅक फाॅर संविधान’चे आयोजन करण्यात आले आहे. 15 ऑगस्ट 2022 ला आपण स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केला. घर-घर राष्ट्रध्वज-तिरंगा उभारला. आता 26 नोव्हेंबर 2023- संविधान दिनापासून ‘घर-घर संविधान’ हे अभियान राबवू या. भारत संविधान साक्षर करू या. ‘वॉक फॉर संविधान’चा हाच उद्देश आहे. या ‘वाॅकथाॅन’मध्ये सहभागी होऊन हातात राष्ट्रध्वज घेऊन संविधानिक मूल्याचा जागर आपण सर्व नागरिक करू या.
या ‘वाॅकथाॅन’मध्ये शासकीय- निमशासकीय कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी, शाळा, महाविद्यालये, विद्यापीठाचे विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षक, सामाजिक संस्था, संघटना, महिला, युवा यांनी संविधानाच्या सन्मानासाठी मोठ्या संख्येने सहभागी होऊन भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने अतुलकुमार खोब्रागडे व डॉ. महेंद्रकुमार मेश्राम यांनी केले आहे. संविधान दिवस हा नागरिकांचा-लोकशाहीचा उत्सव आहे. संविधानाचा जागर रोजच घरोघरी, सर्वत्र, सर्वांनी केला पाहिजे. आपल्या देशाचे संविधान आपण समजून घेतले पाहिजे. त्यावर अंमल केला पाहिजे. राष्ट्रनिर्माणाच्या या कार्यात सर्वांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याची विनंती अतुलकुमार खोब्रागडे व डाॅ. महेंद्रकुमार मेश्राम यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.