चंद्रपूर – कितीदा निषेध नोंदवायचा, कितीदा महिलांनी अत्याचार सहन करायचा. महिलांसाठी केव्हा आपण सुरक्षित स्थान निर्माण करु. त्यांना सुरक्षित वाटेल असा समाज, असा देश केव्हा आपण निर्माण करु असा सतत प्रश्न व आक्रोश समाजकार्याच्या प्राध्यापकांनी व विद्यार्थ्यांनी व्यक्त केला.
मणिपूर येथे महिलांची नग्न धिंड काढून अमानुषपणे जमावाद्वारे अत्याचार करण्यात आला. देशभरात संतापाची लाट उसळली आहे. देशात लोकशाही आहे की नाही असा प्रश्न पडायला लागला आहे. लोकशाहीच्या मूल्यांना सर्रासपणे पायदळी तुडविल्या जात असल्याचे दिसते आहे. मे महिन्यात मणिपूर येथे झालेल्या निंदनीय घटनेविषयी राज्य सरकारने का पावले उचलली नाही व आरोपींना पकडुन कठोर शिक्षेची मागणी का केली नाही असा संतप्त सवाल देशभरातील जनता करत आहे. केंद्र सरकारने याविषयी कठोर पावलं का उचलली नाही. मणिपूर जळत असताना यंत्रणा सपशेल फेल गेल्याचे दिसत आहे असे संतप्त प्रश्नही उपस्थित करण्यात आले.
या संवेदनशिल घटनेविषयी हळहळ व आक्रोश व्यक्त होत असताना या घटनेचा विरोध करण्यासाठी आज चंद्रपुरात चंद्रपूर जनतेकडून भव्य निषेध मोर्चा गांधी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला. यावेळी सुशीलाबाई रामचंद्रराव मामीडवार कॉलेज ऑफ सोशल वर्क , पडोली, चंद्रपूर येथील समाजकार्याच्या विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन निषेध नोंदविला व महिलांच्या सुरक्षेसाठी आवाज बुलंद करण्यात आला.