Homeचंद्रपूरहंगामात एकच कारवाई; जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी घेतला क्लस भरारी पथकाला एसओंच्या...

हंगामात एकच कारवाई; जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी घेतला क्लस भरारी पथकाला एसओंच्या कानपिचक्या

चंद्रपूर ः खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना वेळेवर दर्जेदार, वाजवी दरात बियाणे, रासायनिक खते आणि कीटकनाशके मिळावी यासाठी कृषी विभागाच्या माध्यमातून गुणनियंत्रणासाठी भरारी पथकाची स्थापना करण्यात आली आहे. मात्र, ही भरारी पथके कागदावरच असल्याचे चित्र आहे. खरीप हंगामात भरारी पथकाने चार दिवसांपूर्वी भद्रावतीत एकमेव कारवाई केली. तेलंगणा, आंध्रातून मोठ्या प्रमाणावर बोगस बिटी बियाणे येत असतानाही कारवाई होत नसल्याचे पाहून नवनियुक्त जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी पथकातील अधिकाऱ्यांना चांगलेच सुनावले. रुजू झालेल्यानंतर घेण्यात आलेल्या पहिल्याच बैठकीत त्यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांचा चांगलाच क्लस घेतला.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांची काही दिवसांपूर्वीच बदली झाली. त्यांच्या जागी काही दिवसांपूर्वीच वाशीम येथून शंकरराव तोटावार जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पदावर रूजू झाले. गुरुवार (ता. २२) त्यांनी उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, पंचायत समित्यांचे कृषी अधिकारी यांची आढावा बैठक बोलविली होती. सकाळी दहा वाजता बैठकीला सुरुवात झाली. बैठकीचा प्रमुख मुद्दा कारवाईंचा होता. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दर्जेदार, वाजवी दरात बियाणे, खते, कीटकनाशके मिळावी यासाठी कृषी विभागाने भरारी पथके स्थापन केली आहेत. या भरारी पथकात उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, पंचायत समित्यांचे कृषी अधिकारी यासह अन्य विभागांतील अधिकाऱ्यांचा समावेश आहे. जिल्ह्यातील पंधराही तालुक्यात पथके असतानाही केवळ एकच कारवाई हंगामात झाली. याच मुद्दयावरून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी भरारी पथकात समाविष्ट असलेले अधिकारी, कर्मचाऱ्यांना चांगलेच सुनावले. चंद्रपूर जिल्ह्यात आंध्र, तेलंगणाची सीमा लागून आहे. त्यामुळे या भागातून चोरट्या मार्गाने बिटी बियाणे जिल्ह्यात विक्रीसाठी येत आहे. त्यामुळे भरारी पथकाने त्याचा शोध घेऊन तातडीने कारवाई करावी, असे निर्देश दिले. रासायनिक खतांची विक्री पोस मशीनच्या माध्यमातून झाली पाहिजे. त्याकडेही कृषी विभागाने लक्ष द्यावे. जिल्ह्यातील कृषी केंद्रांची पाहणी करा. त्रुट्या असलेल्या केंद्रावर कारवाई करावी. कृषी केंद्रातून दर्जेदार बियाणे, खते, कीटकनाशके मिळाली पाहिजे. त्यासाठी भरारी पथकाची निर्मिती करण्यात आली आहे. भरारी पथकाने आपले कर्तव्य पार पाडावे, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. जिल्ह्यात रुजू झाल्यानंतर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांची ही पहिलीच बैठक होती. पहिल्याच बैठकीत त्यांनी भद्रावती येथे एकमेव कारवाई झाल्याच्या कारणावरून कृषी विभागातील अधिकाऱ्यांना चांगलेच सुनावले.भरारी पथकाला दिलेल्या कानपिचक्याची दिवसभर चर्चा होती.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!