दिनेश मंडपे
कार्यकारी संपादक
नागपूर – अनंत हाल-अपेष्टा सहन करत व अनेक प्रकारच्या खस्ता खात ज्यांनी एक पिढी घडविली, समृद्ध केली, विकसित केली त्या ज्येष्ठ नागरिकांना उपेक्षित व दुर्लक्षित ठेवणे संविधानाच्या नीतिमत्तेत बसत नाही. ज्येष्ठ नागरिकांना अडगळीत टाकू नका असे भावनिक आवाहन अवयवदान-देहदान चळवळीचे कार्यकर्ते प्रा. डॉ. सुशील मेश्राम यांनी केले.
ऑरेंज सिटी समाजकार्य महाविद्यालय नागपूर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय पर्व अभियानाच्या समारोपीय कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाने दिशानिर्देशित केलेला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय पर्व नागपूरातील ऑरेंज सिटी समाजकार्य महाविद्यालयाच्या वतीने 01 एप्रिल 2023 ते 30 एप्रिल 2023 या कालावधीत विविध प्रबोधनात्मक, वैचारिक व नाविण्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन करून राबविण्यात आला. रविवार दि. 30 एप्रिल 2023 रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय पर्वाचा समारोपीय कार्यक्रम प्राचार्य डॉ. महेंद्रकुमार मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाला. यावेळी विचारमंचावर प्रा. दीपरत्न राऊत प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना जयंती निमित्ताने अभिवादन करण्यात आले. सामाजिक न्याय पर्वाच्या निमित्ताने स्मृतीनगर, कोराडी रोड परिसरातील ज्येष्ठ नागरिकांचा ग्रंथभेट देवून सत्कार करण्यात आला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून ‘अंधश्रद्धा निर्मूलन व अवयवदान’ या विषयावर अवयवदान-देहदान चळवळीचे कार्यकर्ते प्रा. डॉ. सुशील मेश्राम, सेवादल महिला महाविद्यालय नागपूर यांचे विशेष व्याख्यान झाले. प्राचार्य डॉ. महेंद्रकुमार मेश्राम यांनी भूमिका मांडली. संविधान प्रास्ताविका वाचनाने कार्यक्रमाची सुरुवात व राष्ट्रगीताने सांगता झाली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शालिनी तोरे यांनी केले. कार्यक्रमाला डॉ. कल्पना जामगडे, डॉ. विजय तुपे, डॉ. कविता कान्होलकर, प्रा. रचना धडाडे, डॉ. व्यंकटी नागरगोजे, ग्रंथपाल कल्पना मुकुंदे, अधीक्षक मंगलप्रसाद रहांगडाले यांचेसह सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी धीरज रोटेले, शारदा गिरी, रश्मी चांदुरकर, सतीश भराडे, सदाशिव गायकवाड, गोकुल आष्टणकर, जयंत कोसनकर, राजीव काथवटे, उल्हास निखाडे व शरदसिंह बैस यांनी विशेष परिश्रम घेतले.