चंद्रपूर: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस अपार कष्ठ सहन करुन भारतीय संविधानाची निर्मीती केली.याच भारतीय संविधानावर आपला भारत देश चालतो आहे. भारतीय संविधानाने आपल्याला स्वतंत्रपणे जगण्याचा अधिकार दिला आहे. आज खऱ्या अर्थाने संविधानाला जपण्याची गरज आहे. नागरिकांना निस्वार्थपणे संविधानाप्रती असलेली आपली कर्तव्ये व जबाबदारी पार पाडावी लागणार आहे.त्यामुळे संविधान फक्त वाचुन एकूण चालणार नाही तर संविधानिक हक्क आणि कर्तव्यांप्रती जागृत व्हावे लागेल असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
संविधान बचाओ आंदोलन राष्ट्रीय संघटनेच्या वतीने सम्राट अशोक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भव्य विदर्भस्तरीय कार्यक्रम व महापुरुषांच्या साहित्याचे वितरण करण्यात आले. तसेच भव्य जाहिर प्रबोधन व मार्गदर्शन कार्यक्रम पार पडले.
यावेळी पुढे बोलताना. आमदार जोरगेवार म्हणाले की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला बहाल केलेल्या संविधानामुळेच विविध जाती, धर्माचे लोक राहत असलेला भारत देश एकसंघ राहिला आहे. संविधान बचाओ राष्ट्रीय आंदोलन समिती अशा आयोजनातून समाज प्रबोधनाचे काम करत आहे. आम्ही सर्व आमदार दिल्ली संसद भवनमध्ये गेलो असता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहीलेले मुळ हस्तलीखीत संविधान पाहण्याची सर्व आमदारांनी ईच्छा व्यक्त केली. यावेळी तेथे संविधानाची मुळ प्रत पाहण्याचे सौभाग्य मला लाभले. आज सर्व सामान्य कुटुंबात जन्मलेला मी केवळ संविधानीक अधिकारामुळेच जिथे कायदे बनतात तिथे पोहचु शकलो याची मला जाण आहे.मला मिळालेल्या या अधिकाराचा योग्य वापर करण्यासाठी मी कटिबध्द आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाचे महत्व पटवुन दिले होते. शेवटच्या घटकापर्यंत शिक्षण पोहचावे यासाठी त्यांनी संघर्ष केला. आपणही शिक्षण क्षेत्रात काम करण्याचा संकल्प केला आहे. मध्यवर्गीय कुटंबातील मुल शिकत असलेल्या शिक्षण संस्थाना संगणक, सुसज्ज लॅब आपण उपलब्ध करुन देत आहोत. गरजु विद्यार्थ्यांना निशुल्क अभ्यास करता यावा याकरिता मतदार संघात ११ अभ्यासिका तयार करत असल्याचे यावेळी म्हणाले.
सम्राट अशोक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या थोर पुरुषांनी समाज घडविण्यासाठी संघर्ष केला. जनतेला न्याय मिळवून देण्यासह त्यांना त्यांच्या हक्कांप्रती जागृत केले. या तिनही थोर पुरुषांचा शिक्षण क्षेत्रावर अधिक भर होता. या थोर पुरुषांनी त्याकाळी दिलेल्या विचारांची समाजाला आजही गरज असल्याचे यावेळी आमदार जोरगेवार म्हणाले.
सदर कार्यक्रमाला मेघराज राऊत, माजी नगरसेवक सुभाष कासनगोट्टुवार, बिजभुषन पाझारे, गायक विजय शेंडे, चंदा ईटनकर, पपीता जुनघरे यांच्यासह इतर मान्यवर मंचावर उपस्थित होते.
या कार्यक्रमाला नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.






