चंद्रपूर : शहरातील इंडस्ट्रीअल इस्टेट प्रभाग, रयतवारी कॉलरी, प्रगतीनगरातील बि.एम.टी चौक, आमटे ले-आऊट, जलनगर या परिसरात मागील दोन महिन्यांपासून पिण्याच्या पाण्याची समस्या आहे. महापालिका, खासगी टँकरने प्रभागात पाणीपुरवठा करावा लागत आहे. परंतु, पाण्याच्या टँकर वेळेवर उपलब्ध न झाल्यास नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने या परिसरात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था येत्या सात दिवसांत करावी, अन्यथा महिलांचा पालिकेवर घागर मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष राजेश अडूर यांनी दिला आहे.
पिण्याच्या पाण्याच्या टंचाईने त्रस्त झालेल्या शंभराहून अधिक महिलांनी राजेश अडूर यांच्या नेतृत्वात महापालिकेवर धडक देत संताप व्यक्त केला. इंडस्ट्रीअल इस्टेट प्रभाग, रयतवारी कॉलरी, प्रगतीनगरातील बि.एम.टी चौक, आमटे ले-आऊट या परिसरात मागील दोन महिन्यांपासून पिण्याच्या पाण्याची समस्या आहे. परिसरातील नागरिक महानगरपालिका, वेकोलि खासगी टँकरने आपली तहान भागवित आहेत. टँकर वेळेवर न आल्यास येथील नागरिकांना दुसऱ्या प्रभागातून पाणी आणावे लागत आहे. मागीलवर्षी युवक कॉंग्रेसच्या वतीने अमृत योजनेचे पाणी सुरू करण्याची मागणी करण्यात आली. त्यानंतर काही दिवस पाणीपुरवठा करण्यात आला. परंतु, पाणीपुरवठा बंद करण्यात आला. अमृत योजनेसाठी रस्ते खोदण्यात आले. पाईप लाईन टाकण्यात आली. परंतु, अजुनही अमृतचे पाणी येथील नागरिकांना मिळालेले नाही. त्यामुळे येथील नागरिकांची अडचण लक्षात घेता अमृत योजना आणि जुन्या पाईपलाईनने पाणीपुरवठा करण्यात यावा, महानगरपालिकेतर्फे सिंटेक्सद्वारे पाणीपुरवठा करण्यात यावा, आदी मागण्या निवेदनातून करण्यात आल्या.
महापालिकेने यासर्व मागण्या सात दिवसांत पूर्ण न केल्यास चंद्रपूर शहर जिल्हा युवक कॉंग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी प्रतिभा लधवे, अर्चना तिवारी, कल्पना गौरकार, शोभा पोपुलवार, संगीता काटकर, शीतल मेहर, गीता रचवार, निर्मला वासमवार, स्वाती मेश्राम, ज्योती सोनकुसरे, निरंजने काकू, संगीता तुम्मेवार, उषा गैनवार, राजेश्वरी येदुल्ला, लक्ष्मी नातेर, अपर्णा बोघे, सरिता अर्णकोंडा, अनुसूर्या नेरवाठला, लक्ष्मी दयालवार, रजिता गोटे, पुष्पा दासारी, चंदा वर्मा, लक्ष्मी विश्वकर्मा, कनकम्मा उपलेटी, स्वरूपा कृष्णपेली, उझवला लाध्वे, निर्मला चौहान, मल्लुभाई कनकुंटला, रेखा कलागुरा यांच्यासह वॉर्डातील महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.