चंद्रपुर: विचारज्योत फाऊंडेशन, चंद्रपुर तर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून यामध्ये औरंगाबादचा इरफान शेख प्रथम, अकोल्याचा अमर जंजाळ द्वितीय तर चंद्रपूरच्या रोशन भोयर यांनी तृतीय क्रमांक प्राप्त केला.
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेमध्ये प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकासोबत दोन प्रोत्साहनपर बक्षिस ठेवण्यात आले होते. यामध्ये कु. सोनू गोरल (कोल्हापूर) आणि कु. पल्लवी रामटेके (चंद्रपूर) यांनी प्रोत्साहन क्रमांक पटकाविला. निबंध स्पर्धेसाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज आणि आजची तरुणाई’ हा विषय होता. या विषयावर तरुणांनी आपले विचार मांडले. राज्यस्तरीय निबंध स्पर्धा ही १५-३५ वयोगटातील तरुणांसाठी होती. यामध्ये महाराष्ट्रातील अनेक जिल्हातून निबंध प्राप्त झाले होते.
निबंध स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे परीक्षण अरुण झगडकर, अर्जुमनबानो शेख, विशाल शेंडे आणि स्वप्नील मेश्राम यांनी केले तर अंतिम फेरीचे परीक्षक म्हणून डॉ. श्रीकांत पानघाटे आणि प्रतीक्षा गुरनुले यांनी जबाबदारी पार पाडली. निबंध स्पर्धेतील विजेत्यांना रोख रक्कम, प्रमाणपत्र आणि ग्रंथ असे बक्षिसाचे स्वरूप असून पुरस्कार प्राप्त स्पर्धकांना लवकरच बक्षिस पाठविण्यात येईल अशी माहिती संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष सुरज पी दहागावकर यांनी दिली.
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी विचारज्योत फाऊंडेशनचे मुन्ना तावाडे, दिनेश मंडपे, प्रलय म्हशाखेत्री, विशाल शेंडे, प्रतीक्षा वासनिक, अस्मिता वाघमारे, तृप्ती साव, श्याम म्हशाखेत्री, आकाश कडूकर, सिद्धार्थ दहागावकर आणि इतर सदस्यांनी सहकार्य केले.