नागपूर -भारतीय संविधानाला अभिप्रेत लोकशाही गणराज्य घडविण्यासाठी देशातील शेवटच्या वंचित समूहापर्यंत पोहोचून त्यांच्या वेदनेशी आपुलकीचे व माणुसकीचे नाते जोडावे लागेल. तेव्हा कुठे वंचित, शोषित, उपेक्षित व दुर्लक्षित घटकाला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य, न्याय व संधीची समानता प्राप्त होऊन राष्ट्र विकासाची प्रक्रिया अधिक गतिमान होईल, असे प्रतिपादन ऑरेंज सिटी समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेंद्रकुमार मेश्राम यांनी केले.
महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने दि. 26 नोव्हेंबर, संविधान दिन ते 6 डिसेंबर डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महापरिनिर्वाण दिन या कालावधीत ‘समता पर्व’ आयोजित केले असून त्यानिमित्ताने नागपूरातील ऑरेंज सिटी समाजकार्य महाविद्यालयात ‘अनुसूचित जाती उत्थान : दशा आणि दिशा’ या विषयावर आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून वंचित घटकांच्या शिक्षणासाठी काम करणारे खुशाल ढाक व कवी, साहित्यिक तथा चित्रपट दिग्दर्शक नागेश वाहूरवाघ प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी प्राचार्य डॉ. महेंद्रकुमार मेश्राम यांनी अनुसूचित जातीच्या विकासाकरिता संविधानिक तरतुदी, केंद्राचे व राज्याचे बजेट, लोकसंख्येच्या प्रमाणात आर्थिक तरतूद, विकास योजनांवर खर्च, योजनांची प्रभावी अंमलबजावणी व त्यातील अडचणी, योजनांमधील उणिवा व आवश्यक सुधारणा तसेच समाजकार्य महाविद्यालयाची भूमिका व योगदान या विषयावर वस्तुनिष्ठ विश्लेषण केले. खुशाल ढाक व नागेश वाहूरवाघ यांनी अनुभवकथन करत वंचितांची दशा व दिशेचे वर्तमान वास्तव मांडले.
प्रारंभी संविधान प्रास्ताविकेचे वाचन व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना माल्यार्पण करून कार्यशाळेला सुरुवात करण्यात आली. कार्यशाळेत महाविद्यालयाचे विद्यार्थी व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन समान संधी केंद्राच्या समन्वयक प्रा. शालिनी तोरे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. रचना धडाडे यांनी केले. कार्यशाळेची सांगता राष्ट्रगीताने झाली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रंथपाल कल्पना मुकुंदे, मंगलप्रसाद रहांगडाले, राजीव काथवटे, जयंत कोसनकर, निर्मला बागडे, उल्हास निखाडे, सतीश भराडे, शारदा गिरी, अनिता चतुर, मालती तुपे व सदाशिव गायकवाड यांनी परिश्रम घेतले.