Homeचंद्रपूरराजकारणातील अष्टपैलू व्यक्तीमत्व आमदार सुभाषभाऊ धोटे.. - नम्रता आचार्य-ठेमस्कर (जिल्हाध्यक्ष,चंद्रपूर जिल्हा...

राजकारणातील अष्टपैलू व्यक्तीमत्व आमदार सुभाषभाऊ धोटे.. – नम्रता आचार्य-ठेमस्कर (जिल्हाध्यक्ष,चंद्रपूर जिल्हा महिला काँग्रेस, ग्रामीण)

चंद्रपूर:- अलीकडे राजकारणात साधे आमदार जरी बनले, तरी घरापासून ते गाडीपर्यंत सगळे बदललेले दिसते. याला छेद देणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे पूर्व विदर्भातील राजुरा मतदारसंघाचे आमदार सुभाषभाऊ धोटे. सुभाष धोटे हे असे एक नाव आहे, जो माणूस सामान्य लोकांना ओळखतो. सामान्य लोक या माणसापर्यंत सहज पोहचू शकतात. त्यांचे ऑफिस याचे उत्तम उदाहरण आहे. ना काही कॅबिन, ना काही खासगी खोली. जो माणूस आपली समस्या घेऊन येईल तो आमदार सुभाष भाऊ यांच्याशी सरळ, थेट बोलणार. आणि आमदार सुभाषभाऊ सुद्धा सरळ-सरळ जितकी त्या माणसाची समस्या सोडवता येईल, तितकी तात्काळ सोडवणार.

त्यांच्या ऑफिसमध्ये कोणी जरी गेले, तर एक डोळ्यात भरेल अशी एक गोष्ट निदर्शनास येईल. ती म्हणजे तिथे एक फळा लावला आहे. त्या फळ्यावर आज आमदार साहेबांचा दौरा कुठे आहे. ते किती वाजेपर्यंत ऑफिसमध्ये उपलब्ध असतील हे लिहिलं असतं. यातून जी कोणी व्यक्ती ऑफिसमध्ये येईल, त्याला लगेच ही माहिती प्राप्त होते, की आजचा भाऊचा कार्यक्रम काय आहे. वरकरणी ही बाब साधी वाटत असली, तरी यात काय विशेष? एक साधा फळा तर आहे, असे वाटेल. कारण आजचा जमाना, तर व्हाट्सअपचा आहे, असे कोणी म्हणू शकतं. राजुरा मतदारसंघात जिल्ह्यातील सर्वात अधिक ग्रामपंचायती आहेत. सर्वाधिक खेडे आहेत. गावातील अनेक लोकांकडे अजूनही अँनरोईड फोन नसतो. हे वास्तव आहे. तेव्हा हा फळा आजही त्यांच्या नक्कीच उपयोगी पडतो.
तसा राजुरा मतदारसंघ भौगोलिकदृष्ट्या बघितलं, तर महाराष्ट्राची सीमा या मतदारसंघात समाप्त होते. हा मतदारसंघ आदिवासी बहुल आहे. या मतदारसंघातील जिवती तालुक्यासारखा भाग तर शेवटलं टोक आहे. क्षेत्रफळाने चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वात मोठा विधानसभा मतदारसंघ म्हणजे राजुरा. देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा राजुरा निजामांच्या ताब्यात होते. १७ सप्टेंबर १९४८ रोजी राजुरा निजामाच्या तावडीतून मुक्त झाले. १ नोव्हेंबर १९५६ रोजी भाषावार प्रांतरचना अस्तित्वात आली. त्यावेळी राजुरा तालुका द्विभाषिक राज्यातील नांदेड जिल्ह्यात जोडण्यात आला. १९५२ च्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत राजुरा आंध्रप्रदेशात होता. या मतदारसंघाला एक ऐतिहासिक राजकीय पार्श्वभूमी आहे. या मतदारसंघात आमदार सुभाषभाऊ धोटे यांनी आपल्या कर्तृत्ववाने वेगळा ठसा उमटवला हे म्हणण्यास वाव आहे. कारण सुभाषभाऊंनी कधीही मतदारसंघात विकासकामे करतांना इव्हेंटचे रूप दिले नाही. ज्या सामान्य लोकांच्या गरजा असतील, जे सर्वाधिक आवश्यक असेल ते जनतेपर्यंत कसे पोहचेल हाच त्यांचा ध्यास असतो. सुभाषभाऊंनी आपल्या राजकिय कारकीर्दीची सुरवात महाविद्यालयातच केली.विद्यार्थी संघटनेचे ते अध्यक्ष होते. त्याच वेळी खर तर समोर या व्यक्तीसाठी उज्वल राजकिय भविष्य आहे, असे कोणीही सांगू शकले असते. ते काँग्रेसचे एक सच्चे कार्यकर्ते आहेत. एन.एस.यु.आय. चे जिल्हाध्यक्ष, नंतर महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस, जिल्हा परिषद कार्यवाहक अध्यक्ष, प्रदेश प्रतिनिधी अशी अनेक पदे त्यांनी भूषवली. त्याचबरोबर सहकार क्षेत्रात देखील त्यांनी आपला ठसा उमटवला. ते सहकार क्षेत्रातील उत्तम जाणकार आणि अभ्यासू आहेत. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे संचालक, त्यानंतर उपाध्यक्ष, त्यानंतर विभागीय मंडळ शिखर बँकेचे अध्यक्ष असा त्यांचा सहकार क्षेत्रातील प्रवास सुद्धा उल्लेखनीय राहिला. सध्या ते विदर्भ कॉपरेटिव्ह फेडरेशन चे अध्यक्ष आहेत. यामध्ये सुनील केदार, राजेंद्र शिंगणे, सुरेश देशमुख, अरविंद सावकार पोरेड्डीवार यांच्यासारखी मातब्बर मंडळी कार्यरत आहेत. राजकीय क्षेत्रातील सुभाषभाऊंची सुरवात दमदार राहिली, तरी पुढे त्यांना विधानसभेची संधी मिळायला मात्र वेळ लागला. घरी वडील व काका आमदार असूनही त्यांना आमदार बनण्यासाठी संघर्ष करावा लागला. त्यांना अनेकदा वाटायचे आपल्याला तिकीट मिळावे. पण त्यांना ते मिळाले नाही. पहिल्यांदा त्यांना २००९ ला विधानसभेचे तिकीट मिळाले त्यात ते विजयी झाले. दुसऱ्यांदा त्यांना अपयश आले. पण नंतर २०१९ च्या निवडणूकित त्यांना पुन्हा एकदा राजुरा विधानसभेचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. यावेळी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक संकटे आली. पण त्या संकटानासुद्धा सामोरे गेले. स्वतः च्या कष्टाने आमदार बनले. पक्षाने इतक्यांदा तिकीट नाकारले. पण त्यांनी काँग्रेस पक्ष कधीही सोडला नाही. ते संधीची वाट बघत राहिले. जेव्हा संधी मिळाली त्यांनी त्याचे सोने केले.

आपल्या मतदारसंघातील अनेक प्रश्न त्यांनी विधानसभेत उचलले. धसास लावले. ग्रामीण रुग्णालय, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई, जिवती येथील कुपोषणाची समस्या असो. त्यांनी त्या बद्दल आवाज तर उठवलाच, पण शासकीय स्तरांवर भेटीगाठी घेऊन अनेक प्रश्न मार्गी लावले. जिवती तालुक्यातील गेली ५० वर्षापासून रेंगाळत असलेला १४ गावांचा प्रश्न वारंवार विधानसभेत मांडून तेथील नागरिकांना न्याय मिळवून देण्याचे काम सुभाष भाऊंनी केले. त्यांच्या अथक प्रयत्नांनी आज १४ गावांचा सीमावाद प्रश्न निकाली लागला आहे.या चौदा गावांना आता महसूली दर्जा प्राप्त झाला आहे.  त्यांची तळमळ आहे,की मतदारसंघात मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधवांसाठी पाण्याची सुविधा निर्माण करुन हरित क्रांती घडावी.माझा परिसर सुजलाम-सुफलाम व्हावा,यासाठी ते प्रयत्नरत आहेत. राजुरा शहरात तलाव करून त्यांनी राजुरा शहराच्या सौंदर्यीकरणात आणखी भर घातली. गडचांदूरमध्ये नगरपालिका निर्माण व्हावी यासाठी आपल्याच पक्षाची ग्रामपंचायत असतांना देखील मागेपुढे न पाहाता लोकांच्या हितासाठी गडचांदूर नगरपरिषदेसाठी पुढाकार घेतला.जिवती सारख्या आदिवासीबहुल भागात पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी तीन तलावांची निर्मिती केली. मतदारसंघातील आरोग्य समस्या दूर व्हाव्या, यासाठी चार प्राथमिक आरोग्य केंद्राची निर्मिती केली आहे. जिवती तालुक्यात १८० कोटींची विकास कामे सुरू आहे. हे केवळ त्यांच्या प्रयत्नांनी शक्य झाले आहे.

सुभाष भाऊंना काँग्रेस पक्षाचा प्रदीर्घ अनुभव आहे. त्यामुळे आमच्या सारख्या राजकारणात कारकिर्द घडवू इच्छिणाऱ्या अनेकांसाठी ते मार्गदर्शक ठरतात. राजकिय वारसा असूनही कुठल्याही गर्वाचा दर्प त्यांना कधी झाला नाही. आपल्या मतदारसंघातील प्रश्न तर ते सोडवतातच, त्याच बरोबर पक्षाने दिलेले सर्व कार्यक्रम त्यांच्या मतदारसंघात राबवले जातात. मागे पक्षाकडून सर्व जिल्हयात आझादी गौरव पदयात्रा काढण्यात आल्या. प्रत्येक जिल्ह्याने १८० किलोमीटर ची यात्रा काढायची होती. सुभाष भाऊंनी आपल्या नेतृवात  धुव्वाधार पावसात राजुरा मतदारसंघातच स्वतंत्र १८० किलोमीटरची यात्रा काढली.अनेक पूरग्रस्त भागात तर गुडघ्याभर पाण्यात चालून त्यांनी ही यात्रा पूर्ण केली. त्यांचा हा उत्साह तरूणांना लाजवेल असा आहे.

त्यांच्या सोबत त्यांच्या मतदारसंघात फिरणे म्हणजे राजकारणाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच राजकारणातील नव्या मुलांना शिकवणी लावण्यासारखे आहे. त्यांना आपल्या मतदारसंघात फिरत असतांना अनेक लोक भेटतात त्यांच्या सोबत त्यांचा थेट संवाद असतो, पण प्रत्येकाचे नाव त्यांना माहिती असते. त्याच सोबत त्यांची समस्या देखील काय होती हेसुध्दा त्यांना माहीत असते. राजकारणात यशस्वी होण्यासाठी मेहनत,चिकाटी, धैर्याची आवश्यकता असते त्याचा वस्तुपाठ म्हणजे सुभाष भाऊ आहेत.

राजकारणात उशिरा संधी मिळाली नाहीतर कदाचित ते आज आहेत त्या पेक्षाही उंच स्थानावर असते. पण खरं तर संधी उशिरा मिळूनही त्याचे सोने करता येते. लोकांच्या हितासाठी लढता येते, हे सुभाषभाऊंनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. जे आहे, ते आहे सरळ बोलायचे. उगीच मनात एक आणि ओठावर दुसरे, हा त्यांचा स्वभाव नाही. अनेकदा स्पष्ट बोलणाऱ्या व्यक्तींचा लोकांना कधी-कधी राग येतो. पण अशा व्यक्तीच आपल्याला आयुष्यात आरसा दाखवत असतात. जो की प्रत्येक व्यक्तींसाठी आवश्यक असतो. स्पष्टवक्तेपणा स्वभाव असला तरी ते अतिशय संवेदनशील आहेत. वडिलांचे छत्र लवकर हरवल्यावर आपल्या आई सोबत इतर चार भावांना सुभाषभाऊंनी केवळ सांभाळलेच नाही, तर प्रत्येकाला योग्य वळणाला लावून मोठ्या भावाचे कर्तव्य सुद्धा यशस्वीपणे पार पाडले.

त्यांच्याबद्दल आणखी एक सांगायचे झाल्यास ते कार्यकर्त्यांचे गुण पारखून संधी देतात. खूप कमी लोक इतरांच्या गुणांना ओळखतात. आणि त्यांना मोठं करतात. सुभाषभाऊ त्यांच्या पैकीच एक आहेत. मी स्वतः बद्दलसुद्धा म्हणू शकते, कि मला संधी देणारे सुभाषभाऊ सुद्धा आहेत. राजकारणाचे गाढे ज्ञान, इंग्रजी भाषेवर प्रभुत्व, सामान्य जनतेची नाळ ओळखण्याचे कसब, विधानसभेचे ज्ञान, जनतेशी थेट संवाद, गोरगरीब जनतेचे दुःख समजून घेणारे व्यक्तिमत्त्व, महिलांना सन्मान देऊन त्यांना राजकारणात संधी देणारे नेतृत्व, स्वतःच्या मतदारसंघातील अडचणी समजून घेण्यासाठी सतत प्रवास करणारे प्रवासी अशी कितीतरी विशेषणे त्यांना लागू होतात.

आज या कर्मयोगी, राजकारणातील अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा वाढदिवस आहे त्यानिमित्ताने त्यांना खूप खूप शुभेच्छा. त्यांची उत्तरोत्तर प्रगती व्हावी हीच मंगल कामना..

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!