चंद्रपूर ः जिल्हा परिषदेच्या लघुपाटबंधारे विभागाअंतर्गत असलेल्या तलावांतून शेतकरी खरीप, रब्बी हंगामात पाणी घेतात. या पाण्याचा कर त्यांना लघुपाटबंधारे विभागाला द्यावा लागतो. मात्र, गेल्या काही वर्षांपासून पाणी वापरल्यानंतरही शेतकरी पाणीकर देण्यास टाळाटाळ करीत आहे. लघुपाटबंधारे विभागाकडे पाणीपट्टी वसुलीसाठी स्वतंत्र यंत्रणाही नाही. त्याचा परिणाम गेल्या काही वर्षांपासून थकीत पाणीपट्टीचा आकडा वाढत चालला आहे.सध्या २७ लाख ५३ हजार रुपये थकीत आहेत. स्वतंत्र मनुष्यबळ मिळाल्यास पाणीपट्टीची वसुलीस अडचण येणार नसल्याचे विभागाचे म्हणणे आहे.
जिल्हा परिषदेतील लघुपाटबंधारे हा महत्त्वाचा एक विभाग आहे. बंधाऱ्यांची निर्मिती, तलावांची देखभाल दुरुस्ती यासह अन्य कामांचा भार या विभागावर आहे. लघुपाटबंधारे विभागाअंतर्गत जिल्ह्यात ८५ तलाव येतात. त्यापैकी ६५ तलावांतील पाण्याची मागणी शेतकऱ्यांची आहे. जिल्ह्यात सिंचनाची फारशी सुविधा नाही. त्यामुळे पावसाच्या भरोवशावर शेतकरी शेती करतो. पावसाचे प्रमाण कमी असल्यास शेतकरी लघुपाटबंधारे विभागाच्या तलावांतील पाणी घेऊन शेतकरी मोठ्या प्रमाणावर पिके घेतात. खरीप हंगामाचा शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा असतो. जिल्ह्यात प्रामुख्याने धान, कापूस आणि सोयाबीनचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतल्या जाते. मूलपासून ब्रह्मपुरीपर्यंतचा पट्टा धानपट्टा म्हणून ओळखला जातो. अन्य पिकांच्या तुलनेत धानाला पाणी भरपूर लागते. खरीप हंगामात गावखेड्यातील शेतकरी लघुपाटबंधारे विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या ६५ तलावांत मोटारपंप लावून शेतीला पाणी घेतात. पिके घेतल्यानंतर मोटारपंप काढून घेतात. वास्ताविक पाहता तलावाचे पाणी वापरल्यानंतर त्याची पाणीपट्टी भरणे गरजेचे आहे. मात्र, अनेक शेतकरी तलावाचे पाणी वापरून मोकळे होतात. पाणीपट्टी वसुलीसाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना आज या उद्या या असे सांगून बोळवण करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे थकीत पाणीपट्टीचा आकडा गेल्या काही वर्षांपासून वाढत चालला आहे. ३१ मार्चअखेर २७ लाख ५३ हजार ६८१ रुपये थकीत आहे. लघुपाटबंधारे विभागाचे जिल्ह्यात आठ उपविभाग आहे. त्यात चंद्रपूर, चिमूर, भद्रावती, सिंदेवाही, ब्रह्मपुरी, नागभीड आणि मूलचा समावेश आहे. या उपविभागाअंतर्गत ६५ तलाव येतात. या तलावांचे पाणी शेतकरी वापरतात. मात्र, पाणीपट्टी देण्यास टाळाटाळ करीत असल्याचे लघुपाटबंधारे विभागाचे म्हणणे आहे.
——————-
कोट…
लघुपाटबंधारे विभागाअंतर्गत येणाऱ्या तलावांतून शेतकरी हंगामात पाणी घेतात. मात्र, पाणी वापरून पाणीपट्टी देत नाही. त्यामुळे वसुली पाहिजे तशी होत नाही. लघुपाटबंधारे विभागाकडे स्वतंत्र यंत्रणा नाही.
प्रियंका रायपुरे, प्रभारी जिल्हा जलसंधारण अधिकारी, जिल्हा परिषद चंद्रपूर.
—————
बॅाक्स
तालुका तलावांची संख्या थकीत रक्कम
गोंडपिंपरी ७ २६१४३९
चंद्रपूर ४ १४६२६७
बल्लारपूर ३ ४४७५७
पोंभुर्णा ८ २८८१५२
मूल २ ३०१३६६
राजुरा १२ २१३८४५
कोरपना २ ६३४८१
जिवती ३ १२२२७
भद्रावती ७ १८०११९
वरोरा ४ ३४५०७४
सिंदेवाही २ ४४७५६
नागभीड ३ १०९२३४
ब्रह्मपुरी २ ११७४११
चिमूर ६ २५५६९७
————————