बळीराम काळे,जिवती
जिवती : “कनेक्टिग इंडिया” हे ब्रीद वाक्य असलेली व ज्या नेटवर्कने भारतातील ग्रामीण भागात मोबाईल फोन आणि इंटरनेट वापरण्याची अभूतपूर्व क्रांती केली ती बीएसएनएल ची सेवा जिवती तालुक्यात मागील पंधरवड्यापासून कोलमडल्याने बीएसएनएल धारकांना तसेच शासकीय कामावर याचा फटका बसला आहे.
तालुक्यातील महसूल विभाग, पंचायत समिती विभाग, कृषी विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, वन विभाग, पोलीस विभाग, सर्व बँका यासह तालुक्याच्या ठिकाणी असलेले सर्व विभागाचे शासकीय निमशासकीय कार्यालयात बीएसएनएल कंपनीची इंटरनेट सेवा जोडली गेली आहे. परंतु मागील पंधरवड्यापासून बीएसएनएल ची सेवा ठप्प असल्याने शासकीय कामकाजावर परिणाम होताना दिसून येत आहे. व कर्मचारी व कामासाठी आलेल्या नागरिकांना तासंतास ताटकळत बसून राहावे लागत आहे.
तालुक्यात हजारो बीएसएनएल धारक ग्राहक आहेत. महागडे रिचार्ज मारून बीएसएनएल ची सेवा मिळत नसल्याने शेकडो रुपयांचे रिचार्ज वाया जात आहे. यात सामान्य वापरकर्ता भरडला जात आहे. तसेच तालुक्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयात बीएसएनएल चे इंटरनेट जोडल्यामुळे त्या कार्यालयातील सर्व्हर फक्त बीएसएनएल वरतीच चालते त्यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
तहसील कार्यालय, पंचायत समिती, कृषी विभाग या कार्यालयात विविध कामासाठी ग्रामीण भागातून नागरिक येतात परंतु इंटरनेट अभावी त्यांना रिकाम्या हाताने घरी परतावे लागत आहे. नेटवर्क विषयी वारंवार तक्रारी करूनही यावर तोडगा निघत नसल्याने सर्वच शासकीय निमशासकीय कार्यालये व नागरिक हतबल झाले आहेत.
वरिष्ठांनी बीएसएनएल चा कायमस्वरूपी तोडगा काढून बीएसएनएल धारकांना व शासकीय व निमशासकीय कार्यलयातील कर्मचाऱ्यांना दिलासा देण्याची मागणी तालुक्यातुन होत आहे.