बळीराम काळे,जिवती
जिवती : प्रधानमंत्री आवास योजना, शबरी आवास योजना, रमाई आवास योजना अंतर्गत कच्चे घर असलेल्या गरजू लाभार्थ्यांना शासनाद्वारे घरकुल मंजूर केल्या जात आहे. शासनाद्वारे राबविण्यात येत असलेल्या वैयक्तिक लाभाच्या योजना म्हणजे तालुक्यातील काही संधीसाधू राजकीय कार्यकर्ते व बांधकाम ठेकेदारांसाठी जनू काय कुरनच ठरले आहे. मात्र ग्राम पंचायत खडकी रायपूर येथील लेंडीगुडा येथील अशा ठेकेदारांची जिवती पोलिसात तक्रार केली. शोषण व्यवस्थेविरुद्ध दंड थोपटल्याची तालुक्यातील ही दुसरी घटना आहे. पहिल्यांदा कोलामबांधवांनी घरकुल ठेकेदारविरुद्ध पोलिसात तक्रार मागील महिन्यातील शेवटच्या हप्त्यात दाखल केली होती. सामान्य माणसामधील हा बद्दल पाहून अनेकांना घाम फुटू लागल्याचे चित्र आहे.
राज्यात कुठेही ठेकेदारी पद्धतीने घरकुल बांधले जात नसताना केवळ जिवती तालुक्यातच घरकुल ठेकेदारी पद्धतीने का बांधले जात आहे ? असा प्रश्न उपस्थित करून रूग्णसेवक जिवन तोगरे व सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई राठोड यांनी सामान्य माणसाला लुबाडणाऱ्या ठेकेदारविरुद्ध फौजदारी कार्यवाही झाली पाहिजे व ठेकेदारांकडून शासन निधीचा वैयक्तिक लाभासाठी अपव्यव व सामान्य माणसाची फसवणूक हे दखलपत्र गुन्हे करणाऱ्या विरुद्ध तातडीने कारवाही करावी अन्यथा प्रहार संघटनेचे रुग्णसेवक जिवन तोगरे व सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई राठोड यासह तक्रारकर्त्यांनी तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे.
ग्रामपंचायत खडकी रायपूर क्षेत्रातील आत्तम धनू चव्हाण, गणेश रुपला राठोड, रुस्तम लक्ष्मण पोले, बालाजी गंगाराम वाघमपल्ले, कमलबाई दिगांबर जिवनपल्ले, आदीनी ठेकेदारांची तक्रार पोलिसांकडे दाखल केली आहे. यामुळे आतापर्यंत सामान्य माणसाच्या योजना लाटनाऱ्या अनेकांचे कारवाईहीच्या भीतीने धाबे दणानले आहे.
सामान्य माणसाच्या अज्ञानाचा व भित्रेपणाचा गैरफायदा घेऊन येथील काही राजकीय संधीसाधू कार्यकर्ते व त्यांच्या संपर्कातील बांधकाम ठेकेदारांनी सामान्य माणसाच्या योजना लुटण्याचा सपाटा लावला. सामान्य माणसाला घरकुल मंजूर होताच पंचायत समितीमधील यंत्रणा अशा लोकांच्या हाती सबंधित सामान्य माणसाची यादी सोपवून सामान्य माणसाची शोषणाची पार्श्वभूमी तयार करते. सदर ठेकेदार लोकांना गाठून तूझ्या घरकुलाच्या बांधकामाला मंजुरी मिळाली असून, मला तूझ्या घरकुलाचे बांधकामं करायचे आदेश आहेत असे बनाव रचतात व लोकांच्या अज्ञानाचा व भित्रेपणाचा फायदा घेऊन त्याला बँक खात्यातील पैसे काढण्यास बाध्य करतात.
थातूर मातुर व अर्धवट बांधकाम करून सामान्य माणसाच्या घरकुल योजनेचा पैसा लाटनाऱ्यांची मोठी फौज मनिकगड पहाडावर कार्यरत आहे. सबंधित विभागातील शासकीय कर्मचारी व राजकीय कार्यकर्ते सहभागी असण्याची शक्यता वर्तवली जात असून, सामान्य माणसाच्या विकासाठी असलेल्या योजनांवर डल्ला मारणारे रॉकेटच येथे सक्रिय असल्याचे दबक्या आवाजात बोलले जात आहे. लोकांना मंजूर घरकुलांची माहिती संबंधीत विभागातील अधिकारी व कर्मचारी प्रत्यक्ष त्या लाभार्थ्याला सांगण्याऐवजी अशा लुटारु ठेकेदारांना का सांगतात ? घरकुलाच्या बांधकामातील प्रत्येक टप्यावर प्रगती न पाहताच व घरकुल बांधकाम झालेले नसतांनाही लाभार्थ्यांच्या खात्यावर सरसकट पैसे कसे जमा केले जातात ? जिल्हा परिषद व पंचायत समिती या विभागातील अधिकारी व कर्मचारी प्रत्यक्ष गावावर जाऊन घरकुल बांधकामा संदर्भात आढावा का घेत नाहीत ? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उभे राहिले असून, पोलिसांच्या तपासात या प्रश्नांची उकल होऊ शकेल अशी आशा व्यक्त केली जात आहे तसेच पोलिसात तक्रार केल्यानंतर लाभार्थ्यांची फसवणूक केलेल्यावर काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.