जिवती, कोरपना व राजुरा वासीयांचा खरा स्वतंत्र दिन. १७ सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिन

228

दिपक साबने,जिवती

  1. जिवती: तालुक्याच्या मुख्यालयी म्हणजेच तहसील कार्यालय जिवती येथे ” मराठवाडा मुक्ती संग्राम” दिन साजरा करण्यात आला. अतुल गांगुर्डे, तहसीलदार जिवती यांचे हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. यावेळी कोविड -१९ चे सर्व नियम पाळण्यात आले.
  2. १५ ऑगस्ट १९४७ रोजी आपला भारत देश स्वातंत्र्य झाला. त्यावेळी भारत हा विविध संस्थानांमध्ये विस्तारलेला होता. त्यात ५६५ संस्थानापैकी ५६२ संस्थानांनी भारतात विलीन होण्याचा निर्णय घेतला.परंतु हैद्राबाद, जुनागड, आणि काश्‍मीर या संस्थानांनी स्वतःला वेगळे घोषित केले. हैद्राबादने स्वतःला स्वतंत्र्य घोषित केल्यावर साहजिकच भारताच्या बरोबर मध्यावर एक वेगळाच देश निर्माण होण्याची चिन्हे होती. म्हणजेच, आपला भारत देश स्वतंत्र होऊनही काही भाग हा वेगळा होता. तो संस्थानांच्या अधिपत्याखाली येत होता, त्यातच हैद्राबाद संस्थान हे एक होते. भारताच्या पोलिसी कारवाईनंतर १७ सप्टेंबर रोजी हैद्राबाद संस्थानाचे विलनीकरण भारतात करण्यात आले. यात मराठवाडा व चंद्रपूर जिल्ह्यातील मूळ निजामशासित जिवती, कोरपना व राजुरा चा समावेश होतो. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाला आज ७३ वर्षे पूर्ण झाली.
    मराठवाडा हा महाराष्ट्र राज्यातील एक महत्वाचा भाग. गोदावरी नदीच्या खोऱ्यात आणि आसपास वसलेला एक प्रदेश असून त्यामध्ये औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, परभणी, नांदेड आणि हिंगोली अशा आठ जिल्ह्यांचा समावेश होतो. नांदेड जिल्ह्यामध्ये आजचे चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती, कोरपना व राजुरा तालुक्याचा भाग येत होता.
  3. निझामाच्या राजवटीची पाठराखण करणाऱ्या कासीम रझवीने स्थापन केलेल्या ” रझाकार ” संघटनेने मुक्ती संग्राम ची चळवळ दडपून टाकण्यासाठी हिंसक मार्गाचा अवलंब केला होता. भारताचा स्वातंत्र्य लढा अहिंसात्मक होता, पण मराठवाडा मुक्ती संग्राम मात्र सशस्त्र होता. स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वात संपूर्ण हैदराबाद संस्थानात मुक्ती संग्राम सुरु झाला होता. निजामाचा सेनापती कासीम रझवी याने ” रझाकार ” संघटनेच्या माध्यमातून जनतेवर अनेक अत्याचार सुरु केले. या अत्याचारास प्रत्युत्तर देण्यासाठी मुक्ती संग्राम लढा अधिक गती घेत होता. मराठवाडा मुक्ती संग्रामाचा लढा स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वात अनंत भालेराव, गोविंदभाई श्रॉफ, विजयेंद्र काबरा, दिंगबरराव बिंदू, रवीनारायण रेड्डी, देवीसिंग चौहान, भाऊसाहेब वैशंपायन, बाबासाहेब परांजपे आदी नेत्यांनी या लढ्यात महत्वाचे कार्य केले.
  4. भारतीय फौजांनी जि. एन. चौधरी सेना प्रमुखांच्या नेतृत्वात तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या आदेशानुसार १३ सप्टेंबर १९४८ रोजी हैद्राबाद संस्थांनावर चारी बाजूंनी हल्ला चढवला अखेर चार दिवस सतत भारतीय सैन्याच्या तीव्र संघर्षानंतर हैद्राबादचे सेनाप्रमुख जनरल अल इद्रीस यांनी १७ सप्टेंबर, १९४८ रोजी शरणागती पत्करली. या लष्करी कारवाईला ‘पोलिस ऍक्‍शन’ असे म्हणतात. तब्बल १३ महिन्यांनंतर हैद्राबाद संस्थानच्या किंबहुना मराठवाड्याच्या व आजच्या जिवती, कोरपना व राजुरा तालुक्यातील जनतेसाठी स्वातंत्र्याची पहाट उजाडली. व मराठवाडा व मूळ निजामशासित जिवती, कोरपना व राजुरा वासियासाठी स्वातंत्र्याचा खरा जन्म १७ सप्टेंबर १९४८ रोजीच झाला.