चंद्रपूर : गेली चार वर्षे चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात केंद्र सरकार पुरस्कृत अमृत पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. जलवाहिनीच्या कामासाठी शहराच्या विविध भागात खोदकाम करून ठेवले आहे. या खोदकामामुळे ऐन पावसाळ्यात शहरभर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे.
Advertisements
महानगरपालिकेला अनेकदा निवेदने देऊनही अमृत पाणीपुरवठा योजनेच्या कामात गती आलेली नाही. अखेर राष्ट्रवादी काँग्रेसने महानगरपालिकेच्या समोर निषेध आंदोलन करून पालिका इमारतीत कोंबड्या सोडल्या.
झोपेत असलेल्या चंद्रपूर महानगरपालिकेला व प्रशासनाला जागे करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कोंबड्या सोडण्याचे अनोखे आंदोलन केले. शहरातील नागरिकांना खड्ड्यांपासून मुक्त करा, यासह अमृत पाणीपुरवठा योजना पूर्ण करून शहराला शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करा, अशी मागणी आंदोलकांनी केली.