दिपक साबने,जिवती
संपूर्ण देशामध्ये २००८ पासून राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत शालेय आरोग्य तपासणी पथक कार्यरत आहेत. २०१३ सालापासून सदर कार्यक्रमाची व्याप्ती वाढवून शालेय विधार्थ्यासोबतच अंगणवाडी केंद्रातील लाभार्थ्यांची तपासणीही याच पथकाद्वारे केली जात असून आता कार्यक्रमाचे नाव बदलून राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम असे करण्यात आलेले आहे.
सदर पथक जिवती तालुक्यामध्ये सुद्धा २००८ सालापासून कार्यरत असून सदर पथकामध्ये डॉ अंकुश गोतावळे वैधकीय अधिकारी हे पथकप्रमुख असून डॉ अर्चना तेलरांधे या महिला वैधकीय अधिकारी आहेत सोबतच एक आरोग्यसेविका व औषधनिर्माता आहे . पथकामार्फत बालकांच्या जिवनाचा दर्जा वाढविण्यासाठी कमी वयात आजाराचा शोध घेऊन त्यावर उपचार केले जातात आणि अगदी सुरुवातीलाच उपचार मिळाल्याने बालकांचे व्यंगत्व , अपंगत्व टाळले जाते आणि मुलांचे आरोग्य सुदृढ झाल्यामुळे त्यांचे जिवन गतिमान होण्यास मदत होते. सदर पथकामार्फत मुख्यत अंगणवाडी केंद्रातील बालकामध्ये जन्मतः व्यंग, जिकनसत्वांची कमतरता, डिले माईलस्टोन आणि शारीरिक आजार यांची पाहणी केली जाते. तर शाळेच्या मुलांमध्ये शारीरिक, मानसिक आजारांची तपासणी केली जाते आणि किशोरवयीनांना स्वतंत्रपणे मार्गदर्शन केले जाते.
आतापर्यंत सदर पथकाने शाळेतील ९८८२८ विद्यार्थ्यांची तर अंगणवाडी केंद्रातील ४९७१४ लाभार्थ्यांची तपासणी केली आहे . तपासलेल्यापैकी ९७१९ बालके किरकोळ आजारी आढळले असून ११७५ विध्यार्थ्यांना संदर्भसेवा पुरवलेली आहे. तसेच गंभीर आजारावरील शस्त्रक्रिया करुवून घेतल्या आहेत त्यामध्ये मुख्यतः हृदयाच्या २२ शस्त्रक्रिया, मेंदूची १, किडनीची १ तर १०० शस्त्रक्रिया या हर्निया, हायड्रोसील ,फायमोसिस, क्लब फूट, तिरळेपणा, अस्थिव्यंग, अपेंडिक्स, पाइल्स, कर्णस्राव या आजारांच्या आहेत. सोबतच क्षयरोग ५, कुष्ठरोग ३ आणि इतर अनेक आजारावर औषधोपचार करून बरे केले आहे . तसेच सॅम मॅम च्या २९१ बालकांना सामान्य श्रेणीमध्ये आणले आहे. नुकतेच शिवम पोले हिरापूर या बालकाची शस्त्रक्रिया झाली असून त्याचा फालोअप घेण्यास जात असलेल्या डॉ गोतावळे यांच्यासोबत भेट झाली असता पथकाची संपूर्ण माहिती त्यांनी दिली, छोट्या – छोट्या गोष्टींची प्रसिद्धी करण्याची फॅशन असलेल्या काळात एवढे मोठे काम करूनसुद्धा कुठलीही जाहिरातबाजी न करणारे डॉ गोतावळे यांच्यासारखे खरे सेवक कमीच असतात. सुदैवाने आमच्या तालुक्यात असे अधिकारी आहेत हे जिवतीच्या जनतेचे सुदैवच म्हणावे लागेल .
——————————
मी राष्ट्रीय बाल स्वास्थ पथकाच्या माध्यमातून 0 ते 19 वयोगटातील बालकांना सेवा देत असून सदर काम मा. जिल्हा शल्यचिकित्सक श्री डॉ निवृत्ती राठोड आणि कार्यक्रम पर्यवेक्षिका कु. श्वेता आईंचवार यांच्या मार्गदर्शनात करीत असून अनेकांना जीवदान देऊ शकलो हीच माझी कमाई आहे.
– डॉ अंकुश गोतावळे
वैधकीय अधिकारी
रा .बा .स्वा .का .जिवती