प्रीतम गग्गुरी (प्रतिनिधी)
वैरागड : वैरागड-देलनवाडी मार्गावरील मोहझरी जवळील सुकाळा या फाट्यावर मागील १५ वर्षांपूर्वी प्रवासी निवारा बांधण्यात आला होता, पण निकृष्ट बांधकामामुळे हा प्रवासी निवारा अल्पावधीत जीर्णावस्थेत आहे. तो नष्ट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सध्या प्रवाशांना झाडाच्या आडोशाला उभे राहून वाहनांची प्रतीक्षा करावी लागते. वैरागड येथून देलनवाडी,मानापूर पुढे अंगारा, मालेवाडा या गावांना जोडणारा हा मुख्य मार्ग असून, या मार्गाला नेहमी वाहनांची वर्दळ असते. या मार्गाने आरमोरी किंवा जिल्हा मुख्यालयापर्यंत पोहोचण्यासाठी मोहझरी, सुकाळा व शिवनी येथील नागरिक या प्रवासी निवाऱ्याजवळ थांबून वाहनाची प्रतीक्षा करीत उभे राहतात, परंतु या निवाऱ्याची कमालीची दुरवस्था झाली आहे. येथे प्रवाशांना बसायला योग्य अशी जागा नाही.