नागेश इटेकर तालुका प्रतिनिधी
गोंडपिपरी : आदिवासीबहुल, मागास व नक्षलग्रस्त क्षेत्र असलेल्या गोंडपिपरी तालुक्यातील नागरिकांचे वर्षभराचे बजेट सावरणाऱ्या तेंदूपत्ता हंगामाला अनेक ठिकाणी प्रारंभ झाला असताना एन कमाईच्या हंगामातच अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने अनेकांना या रोजगारापासून मुकावे लागले. तोंडात आलेला घास हिरावल्या सारखा झाल्याने तालुक्यातील तेंदु पत्ता संकलन करणाऱ्यांमध्ये नाराजीचा सुर पसरला आहे.
तेंदू पत्ता पान फळी सुरू होऊन काही दिवस झाले.येथील लोकांना हंगामी स्वरूपातील रोजगार मिळत असल्याने पहाटेच तेंदूची पाने तोडण्यासाठी नागरिकांची रानात लगबग दिसू लागली होती आणि दिवसभर सहपरिवार मिळून पानांचे मुडके तयार करण्यात नागरिक मग्न झाले होते.तालुक्यातील नागरिकांना कमी दिवसात अधिक पैसे देणारा रोजगार म्हणून तेंदूपत्ता तोडणी कामाकडे पाहिले जाते.तालुक्यात विविध ठिकाणी तेंदूपत्ता संकलन कामास सुरुवात झाली असून यामुळे स्थानिक मजुरांना रोजगार उपलब्ध झाला होता. कोरोना महामारीच्या संकट काळात रिकाम्या हाताला काम नसल्याने मजुरांची ससेहोलपट चालली आहे. त्यामुळे वनविभागाने तालुक्यातील नागरिकांची गरज लक्षात घेऊन तेंदू फळी सुरू केल्याने नागरिकांना दिलासा मिळाला होता.
तसेच तालुक्यातील जंगल भागातील नागरिकांचे वर्षभरातील अधिक उत्पन्न देणारा रोजगार असलेल्या तेंदूपत्ता संकलन या कामाकडे नजरा लागलेल्या होत्या. जंगलव्याप्त भागातील नागरिक तेंदूपत्ता तोडणी कामातून कमावलेल्या पैशातून पावसाळ्यातील उदरनिवार्हाची गरज भागवीत असतात. साधरणत: दरवर्षी मे महिन्यात तेंदूपत्ता संकलन कामास सुरुवात होत असते.सुरूवात तर झाली पण त्या सुरुवातीचा अंत लवकरच झाला. हातात आलेला काम पार एका क्षणात निसटून गेला.
लॉकडाउन कालावधीत रिकाम्या हाताला कोणतेही काम नव्हते, त्यामुळे तालुक्यात तेंदूपत्ता संकलन फळी सुरू झाल्याने गावातील नागरिकांना आशेचा किरण गवसला. तेंदूपाने गोळा करण्या करीता पहाटेलाच वणात जात असत आणि पाने घरी आणून मुडके तयार करून विकायला पान फळीवर नेत असत. हे काम करतानासुद्धा नागरिक आपल्या आरोग्याची काळजी घेत,कोरोना संसर्ग होऊ नये म्हणून मास्क लावून मुडके तयार करायचे. तेंदूपत्ता संकलन कामातून गावातील नागरिकांना रोजगार उपलब्ध झाल्याने मजुरांच्या चेहऱ्यावर हास्य फुलल्याचे दिसून येत होते मात्र निसर्गाने त्यांना साथ दिली नाही एन वेळेवर त्यांचा घात केला.
तेंदूपत्त्यापासून बिडी तयार करतात. पण, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात एकही बिडी कारखाने नाही. येथून केवळ पाने खरेदी करून ती तेलंगणा, आंध्र प्रदेश आदी राज्यांमध्ये नेली जातात. तिथे बिडी तयार होते. जिल्ह्यातील नागरिकांचे मोगम उत्पन्न जवळपास या एक महिन्यांच्या हंगामातून होतो. त्यातून पावसाळ्यातील घर दुरुस्तीची कामे, मुलांचे शिक्षण, जीवनावश्यक वस्तू, शेतीसाठी बियाणे, खते, कीटकनाशके, सणासुदीसाठी आवश्यक साहित्य या सर्वांची तजवीज या एका हंगामातून करत असतात. त्यामुळे दरवर्षी तेंदूपत्ता हंगाम नागरिकांसाठी पर्वणी असतो.परंतु या हंगामात अवकाळी पावसाने अकारण हजेरी लावल्याने तालुक्यातील देंदू पत्ता संकलन करणाऱ्यांवर विरजण पडले.