नागेश इटेकर / तालुका प्रतिनिधी
गोंडपिपरी :तालुक्यातील लाठी गावा सारख्या आदिवासी भागात कोणत्याही प्रकारची वैद्यकीय पदवी नसतांना बंगाली बोगस डॉक्टरांनी आपला बस्तान मांडला आहे.अश्या बोगस डॉक्टरांकडून स्थानीक तसेच या भागातील भोळ्याभाबड्या आदिवासी बांधवांची आर्थिक लूट करण्यासोबतच त्यांच्या जीवाशी खेळ चालविला आहे. जास्त दराने आणि स्वतः जवळील गोळ्या औषधी व सलाईन देऊन परिसरातील मुख्यतः आदिवासी बांधवांची उपचाराच्या नावावर फसवणुक करून हे बोगस डॉक्टर गब्बर बनले आहेत.
अश्या बोगस डॉक्टरांच्या उपचारामुळे गाव खेड्यामध्ये अनेक रुग्ण दगावल्याच्या घटना सुद्धा घडल्या आहेत.हे चित्र जास्त प्रमाणात आदिवासी भागात पाहायला मिळतात.याचे कारण म्हणजे आदिवासी बांधवांना या बाबत काहीही माहिती नसते,अपुऱ्या उपचाराच्या सोयी सुविधांपासून ते अनभिज्ञ असल्याने एखादा रुग्ण त्यांच्या उपचारादरम्यान दगावला तर तो रुग्ण दुर्धर आजाराने दगावला,त्याची वाचण्याची शक्यता कमी होती असे चित्र उभे करून रुग्णांच्या कुटुंबीयांची समजूत काढन्याचा डाव रचून त्यावर पडदा टाकण्याचे काम हे बोगस डॉक्टर करतात.
सध्या देशात कोरोना विषाणूच्या महमारीची साथ चालु आहे.जिकडे तिकडे या साथीने हाहाकार माजविला असून चौफेर मृत्यूचे तांडव पाहायला मिळत आहे.अश्या संकटात सुद्धा नको त्या रुग्णांवर उपचार करून लोकांच्या जीवाशी खेळत आहेत.अव्वाच्या सव्वा दराने बोगस डॉक्टर रुग्णांकडून पैसे वसूल करत आहेत.या प्रकाराबाबत आरोग्य प्रशासन अनभिज्ञ कसा.? सध्या पावसाळ्याचे दिवस जवळ आले असून हवामानात देखील बराचसा बदलाव होत आहे अश्या परिथितीत अतिसार,मलेरिया, डेंग्यू सारखे आजार निर्माण होतील.गाव खेड्यामध्ये उपचाराच्या सोयी सुविधा विशेषतः राहत नाही त्यामुळे नाईलाजाने त्यांना अश्या झोलाछाप बोगस डॉक्टरांकडून उपचार करून घ्यावा लागतो.या डॉक्टरांकडे कोणत्याच प्रकारची पदवी किंवा उपचार करण्याचे विधिवत प्रशिक्षण नसते तरी देखील रुग्णांवर उपचार करून आपला गोरखधंदा चालवतात.
निष्पाप लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या संबंधीत परिसरातील बोगस डॉक्टरांवर जो पर्यंत शासनाकडून कठोर कार्यवाही होत नाही तो पर्यंत त्यांच्या बोगस डॉक्टरकिला व प्रॅक्टिसला आळा बसणार नाही आणि निष्पाप आदिवासी बांधवांच्या जीवाशी खेळणारा खेळ थांबणार नाही.या अगोदर या बाबत खेड्यातील काही सुज्ञ नागरिकांनी अनेक तोंडी तक्रारी दाखल केल्या परंतु त्यावर थातुर मातुर कार्यवाही करण्यात आली.त्यामुळे त्यांचा बोगस व्यवसाय आजही तेजीत चालु आहे.यावर कुठेतरी अंकुश लावणे अती आवश्यक आहे.काही डॉक्टर आपल्या घरीच दवाखाना सुरू करून उपचार करतात तर काही गाडी वर बसून गावागावात फिरून उपचारासाठी लागणारी उपकरणे आणि औषध्या बॅग मध्ये ठेवून आपला व्यवसाय करतात.
हा प्रकार अतिशय धक्कादायक असून गोरगरीब रुग्णांचा जीव जाण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून अश्या बोगस डॉक्टरांचे साहित्य जप्त करून त्यांचेवर कडक कार्यवाही करावी अशी मागणी लाठी गावातील नागरिकांनी केली आहे.