भारताच्या राजकारणात एक महत्वाचे नेते म्हणून ओळख असलेले काँग्रेसचे खासदार अॅड. राजीव सातव यांना कोरोनाची लागण झाली होती, त्यामुळे यांच्यावर पुणे येथील जहांगीर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. २९ एप्रिल रोजी त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. तातडीने गरज भासल्यास ‘इक्मो’ मशीनदेखील उपलब्ध करण्यात आली होती. परंतु, राजीव सातव यांची कोरोनाविरोधातील लढाई अखेर अपयशी ठरली. कोरोनाने आणखी एका महत्वाच्या नेत्याचा बळी घेतला. राजीव सातव यांची राजकीय प्रवास थोडक्यात जाणून घेऊ या…
१) काॅंग्रेस पक्षातील अत्यंत महत्वाचे समजले जाणारे राजीव सातव हे पहिल्याच प्रयत्नात आमदार झाले होते. इतकंच नाही तर, दुसऱ्या प्रयत्नात थेट खासदारकीही त्यांनी मिळवली होती.
२) राज्याच्या राजकारणात कॉंग्रेसकडून मुख्यमंत्री पदाचे दावेदार म्हणूनही राजीव सातव यांची ओळख निर्माण झाली होती.
३) कॉंग्रेस पक्षाच्या नव्या पिढीतील नेत्यांमधील एक धुरंधर आणि तरबेज राजकारणी म्हणून राज्यातच नाही, तर देशभरात त्यांना ओळखळे जात होते. राहुल गांधी यांच्या कोअर टीममधील हुकमी एक्का म्हणूनही त्यांची वेगळी ओळख होती.
४) राजीव सातव यांना आई माजी मंत्री रजनीताई सातव यांच्याकडून बालवयातच राजकारणाचं बाळकडू मिळालं होतं. त्यामुळे तरुणपणीच राजकारणात पदार्पण केलेल्या सातव यांची राजकीय वर्तुळात दमदार ओळख निर्माण झाली.
५) २००२ मध्ये कळमनुरी (जि. हिंगोली) पंचायत समितीच्या मसोड गणाचे ते सदस्य झाले होते. २००७ मध्ये हिंगोली जिल्हा परिषदेमध्ये सदस्य व कृषी व पशुसंवर्धन विभागाचे सभापती पद भूषविले होते.
६) २००९ मध्ये कळमनुरी विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडूण आहे होते. याच कालावधीत युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि नंतर अखिल भारतीय युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष झाले होते.
७) देशभर नरेंद्र मोदींची लाट असताना त्या लाटेतही राजीव सातव २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये हिंगोली मतदारसंघातून लोकसभेत निवडून गेले होते.
८) त्यांची संसदेतील भाषणं ही अभ्यासपूर्ण होती. लक्षवेधी माडंणी करण्याचं कसब त्यांच्याकडे असल्यामुळे राजीव सातव यांना सगल तिसऱ्यांदा ‘संसदरत्न’ पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
९) काॅंग्रेस पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून त्यांनी वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. त्यात युवक कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्षपद, गुजरात विधानसभेच्या निवडणुकांमधील प्रचार, पंजाब राज्यात कॉंग्रेसचा सत्ता मिळवणे, या महत्वपूर्ण सर्व जबाबदाऱ्या राजीव सातव यांनी सहज पार पाडल्या होत्या.