रेगडी जलाशयाचे कालवे घेणार आता मोकळा श्वास.
प्रतिनिधी गौरव बुरांडे घोट
रेगडी |
रेगडी येथे कन्नमवार जलाशयाच्या नहरातील साचलेला गाळ उपसा करण्याच्या कामाला अखेर सुरुवात करण्यात आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून गाळ व कचऱ्यामुळे अडथळा निर्माण झालेल्या दिना प्रकल्पाच्या कालव्यांना आता दिलासा मिळणार आहे. या उपक्रमामुळे परिसरातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार असल्याचे सांगितले जात आहे.

पाटबंधारे विभाग, प्रभु फाउंडेशन तसेच कन्नमवार पाणी वापर संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता मोहिमेची सुरुवात करण्यात आली. कालव्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने शेवटच्या टोकावरील शेतकऱ्यांना सिंचनासाठी मोठा संघर्ष करावा लागत होता. ही अडचण लक्षात घेऊन मोठ्या स्तरावर गाळ उपसा करण्याचे काम हाती घेण्यात आले.
या उपक्रमामुळे जलसाठ्याची क्षमता वाढणार असून उन्हाळी हंगामातील विविध पिकांना याचा थेट फायदा होणार आहे. कालव्यांमधून पाण्याचा प्रवाह सुरळीत झाल्याने परिसरातील तलाव व जलस्रोत पुन्हा जिवंत होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. यामुळे भूजल पातळीतही वाढ होण्याची अपेक्षा आहे.
पाणीपुर्तीचा योग्य विनियोग करून सहकार्य करावे, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष प्रा. प्रदीप भोंडकर यांनी यावेळी केले.
यावेळी उपस्थित
कन्नमवार पाणी वापर संस्था अध्यक्ष प्रा. प्रदीप भोंडकर, सचिव संजय लाटे, सामाजिक कार्यकर्ते राजू धोडे, चंद्रभूषण वाल्दे, गटप्रमुख सुरज नेताम, संपर्क प्रमुख राजू राठोड, शिवसेना सदस्य सत्यवान पिपरे, निखिल सातपुते तसेच शेतकरी उपस्थित होते.







