बळीराम काळे,जिवती
जिवती : तालुक्यातील आंबेझरी येथे फेब्रुवारी, २०२२ मध्ये रोजगार हमी योजनेवर तब्बल दोन महिने मजुरांनी बंधाऱ्यातील गाळ काढण्याचे काम केले मात्र आदिवासी मजुरांना डावलून इतर मजुराना मजुरी देण्यात आली असल्याने सदर कामात गैरव्यवहार झाले असल्याचे मजूर सांगत आहेत. यासंदर्भात आंबेझरी येथील आदिवासी मजुरांनी जून,२०२२ ला तहसिल कार्यालयावर मोठया संख्येने जाऊन मजुरीची मागणी केली. मात्र अश्वासनापलेकडे त्यांना काहीच मिळाले नाही.
श्रमिक एल्गार च्या वतीने चौकशी करून आदिवासी मजुरांना मजुरी देण्याबाबत १३ जुलै २०२२ ला जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले मात्र काहीच झाले नाही. तसेच २५ जुलै,२०२२ ला श्रमिक एल्गार चे उपाध्यक्ष घनश्याम मेश्राम व आदिवासी मजूर मोठया संख्येने गट विकास अधिकारी यांची भेट घेऊन समस्या सांगितली असता गट विकास अधिकारी यांनी तात्काळ चौकशी करून गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिले व संबंधित अधिकाऱ्यांना आदेश काढण्याचे निर्देशही दिले परंतु सबंधितांकडून विविध कारणे सांगून अद्याप समस्येचे निराकरण झाले नसल्याने मजुरांची दिशाभूल केली जात असल्याचाही आरोप मजुरांनी केला आहे.
काम केलेल्या लक्ष्मीबाई सिताराम कोरांगे व ताराबाई पैकू कोटनाके यांचे मस्टर मध्ये नावच नाही मग यांना मजुरी कशी मिळणार असा प्रश्न घनशाम मेश्राम यांनी उपस्थित केला असून काम न केलेल्या व्यक्तींचे नावे मस्टर च्या यादीत असून त्यांचे नावे मजुरी काढून गैरव्यवहार केले असतांना प्रशासन गप्प का ? यावरून शासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्न चिन्ह निर्माण झालेला असून आंबेझरी येथील रोहयो कामात झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी करून गुन्हा दाखल करावा व आदिवासी मजुरांना त्यांच्या हक्काची मजुरी द्यावी अशी मागणी श्रमिक एल्गार ने केली आहे.
यावेळी खुशाल मडावी, पिसाराम मडावी, विठ्ठल मडावी, सुरेखा मडावी, रसिका मडावी, सीताराम मडावी, वनिता कोटनाके, गिता सलाम यासह अनेक मजूर उपस्थित होते