एकीकडे कर्करोगाने आजारी पतीच्या उपचाराची चिंता अन् दुसरीकडे उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन असलेला ई-रिक्षा ४० हजारांच्या बॅटऱ्यांअभावी घरी पडून. अशा दुहेरी संकटात दिव्यांग मंजूषा पानबुडे सापडल्यानंतर त्यांची बातमी आली अन् तिच्या आर्थिक मदतीसाठी अनेक हात पुढे सरसावले. मिळालेल्या मदतीमुळे मंजूषाचा ई-रिक्षा पुन्हा एकदा नागपूरच्या रस्त्यांवर धावू लागला आहे.
डाव्या पायाने पोलिओग्रस्त असलेल्या मंजूषाचे पती कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराचा सामना करीत आहेत. त्याचवेळी चरितार्थाचे एकमेव साधन असलेला ई-रिक्षा अनेक महिन्यांपासून बंद असल्यामुळे ती बेरोजगार होऊन घरी बसली होती. ४० हजारांच्या बॅटऱ्यांसाठी मंजूषाने जागोजागी हातपाय मारले. पण कुणाकडूनही मदत झाली नाही. अखेर ‘ पतीच्या आजारात जमापुंजी संपली, संसाराची ‘बॅटरी गुल’ अशा आशयाची बातमी उमटताच तिच्या मदतीसाठी अनेक हात पुढे आले. अपंग सेवा निकेतन या सस्थे द्वारे मंजूषाला चार बॅटऱ्या विकत घेऊन देण्यात आल्या. खाकी वर्दीतील एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यानेही ३० हजारांची मोठी मदत केली. याशिवाय अन्य दोन व्यक्तींनी प्रत्येकी पाच हजारांची मदत दिली. या सर्वांनी नाव न प्रकाशित करण्याच्या अटींवर ही मदत केलेली आहे.
मदतीमुळे मंजूषाचा रिक्षा पूर्वीप्रमाणे पुन्हा नागपूरच्या रस्त्यांवर धावू लागला. शिवाय पतीच्या उपचारासाठीही थोडाफार हातभार लागल्याचे मंजूषाने सांगितले. ३६ वर्षीय मंजूषा पती, दोन मुले व वृद्ध सासूसह अजनी परिसरातील चुनाभट्टी झोपडपट्टीत दहा बाय दहाच्या एका छोट्याशा खोलीत राहाते. संसाराचा गाडा सुरळीत सुरू असताना अचानक एकेदिवशी सलूनचा व्यवसाय करणाऱ्या पतीला दुर्धर आजाराने ग्रासले. आजारामुळे नियमित ग्राहक दूर जाऊन त्यांचा सलून व्यवसायही ठप्प झालेला आहे. अशा कठीण प्रसंगी पत्नीने स्वतः पुढाकार घेत ई-रिक्षा हाती घेतला. दोन वर्षांपूर्वी शासनाकडून मिळालेला ई-रिक्षा चालवून ती सध्या आपले कुटुंब पोसते.
…
सोनू सूदनेही पुढे केला होता मदतीचा हात
सदर बातमी कुणीतरी ट्विटरवर टाकल्यानंतर ती वाचून अभिनेता सोनू सूदनेही मदतीसाठी हात पुढे केला होता. मात्र, बॅटऱ्यांची सोय झाल्याचे सांगून स्वाभिमानी मंजूषाने त्यांची मदत नम्रपणे नाकारली. नागपुरात शिकलेला सोनू मदतीसाठी सर्वत्र प्रसिद्ध असून, त्याने आतापर्यंत शेकडो गरजू लोकांना सढळ हाताने मदत केली
…
अपंग सेवा निकेतन व मदत करणाऱ्यांचे मानले आभार
अडचणीच्या काळात मदतीला धावून आलेल्या सर्व दानशूर व्यक्तींचे मंजूषाने आभार मानले. त्यांचे उपकार मी आयुष्यात कदापि विसरू शकत नाही, अशा शब्दांत तिने आपल्या भावना व्यक्त केल्या.