निराधार बांधवांची लक्षणीय उपस्थिती
बाखर्डी:- कोरपना तालुक्यातील निमणी येथील उपसरपंच उमेश राजुरकर यांची आमदार सुभाष धोटे यांच्या शिफारशीनुसार संजय गांधी निराधार समितीच्या कोरपना तालुका अध्यक्षपदावर निवड झाल्याने ८ नोव्हेंबर रोज रविवारला सायंकाळी ७ वाजता निमणी येथील निराधार बांधवांकडून शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष मधुकर टेकाम उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून स्मार्ट ग्राम बिबीचे उपसरपंच प्रा. आशिष देरकर, तंमुस अध्यक्ष अशोक झाडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रकाश टेंभुर्डे, भारतीय सेनेतील मिलिंद टेकाम, रमेश भोंगळे, विलास कोंगरे, शैलेश लोखंडे, मारोती कोडापे, गजानन गोबाडे, रामकृष्ण बंडेवार, गजानन गौरकर, ग्रामपंचायत सदस्या सुमन जगताप, गिरजा गोबाडे, अश्विनी टेकाम, सुनंदा टोंगे आदी उपस्थित होते.
प्रा. आशिष देरकर यांनी सांगितले की, अंध, अपंग, वृद्ध, मतिमंद, मुक व दिनदुबळ्यांची सेवा करणे हीच खरी माणुसकी असून त्यांची सेवा करण्याची संधी निमणी गावाला मिळणे ही अभिमानाची बाब असल्याचे मत व्यक्त केले.
सत्कारमूर्ती उमेश राजुरकर म्हणाले की ज्या निराधार बांधवांना आधार देण्यासाठी माझी निवड करण्यात आली आज त्याच निराधार बांधवांकडून माझा सत्कार म्हणजे माझ्या जीवनातील अविस्मरणीय क्षण आहे. आणि याचे साक्षी तुम्ही निराधार बांधव आहात. तसेच संजय गांधी निराधार योजनेचा लाभ कोरपना तालुक्यातील निराधार व्यक्ती, अंध, अपंग, वृद्ध, मतिमंद, विधवा, अनाथ, परितक्त्या, दुर्धर आजार असणाऱ्यांना पोहचविण्याचे यावेळी आश्वासन दिले.
कार्यक्रमाचे संचालन नुतन काकडे, प्रास्ताविक मोतीराम पाटील तर आभार मारोती कोडापे यांनी मानले. यावेळी गावातील निराधार बांधव व गावकरी बहुसंख्येने उपस्थित होते.