रस्त्यावरील खड्डे दुरुस्त करून रस्ता सुरळीत करण्याची उलगुलान संघटनेची मागणी
चंद्रपूर प्रतिनिधी /कैलास दुर्योधन
मूल-चंद्रपूर राष्ट्रीय महामार्गावर मूल येथे रेल्वे गेट जवळ मोठमोठे खड्डे पडले होते. या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना मोठी अडचण निर्माण झाली होती. तसेच या खड्ड्यामुळे बरेच किरकोळ अपघात झाले होते. बऱ्याच दिवसापासून हे खड्डे वाहतुकीस अडचण निर्माण करत होते. प्रशासनानेही सदर खड्डे बुजवण्याकडे दुर्लक्ष केलेले आहे. ही बाब उलगुलान संघटनेचे अध्यक्ष निखिल वाढई व त्यांच्या कार्यकर्त्यांना लक्षात आली. कार्यकर्त्यांनी तात्काळ लक्ष देऊन सदर रस्त्यावरील खड्ड्यावर मुरूम व गिट्टी आणून टाकली व खड्डे व्यवस्थित केले. तसेच सदर रस्त्यावरील खड्डे प्रशासनाने तात्काळ बुजवून रस्ता सुरळीत करावा अशी मागणी सुद्धा केली.
रस्त्यावरील खड्डे बुजविण्याकरिता उलगुलान संघटनेचे अध्यक्ष निखिल वाढई, उपाध्यक्ष प्रणित पाल, आकाश येसनकर, रोहित शेंडे, अक्षय दुमावार तथा उलगुलान संघटनेच्या अन्य कार्यकर्त्यांनी श्रमदान केले.