चंद्रपूर (प्रतिनिधी)- झाडीबोली साहित्य मंडळ जिल्हा शाखेद्वारा आयोजित कवयित्री जयंती वनकर यांच्या ‘ पेटत राहा ठिणगी बनून ‘ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन तुकूम येथील समता सिद्धार्थ बुद्धविहारात संपन्न झाले .
अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर होते. कार्यक्रमाचे उद्घाटन अ.भा. रा.स.पेन्शनर्स संघटनेचे शालिक माऊलीकर यांच्या हस्ते झाले. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. इसादास भडके, झाडीबोलीचे जिल्हाध्यक्ष कवी अरुण झगडकर, गझलकार दिलीप पाटील,सामाजिक कार्यकर्ते डॉ. जे.बी. रामटेके, ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत पि.व्ही. मेश्राम आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
याप्रसंगी डॉ. भडके म्हणाले की, या काव्यसंग्रहाच्या प्रेरणास्थानी विश्वरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार असून मानवतेचं संवर्धन करणाऱ्या ह्या रचना आहेत. बंडोपंत बोढेकर म्हणाले की, या काव्यसंग्रहातून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडून येत असून त्यातून बदलत जाणा-या समाज जीवनाचा वेध कवयित्रींने घेतला असल्याचे मत व्यक्त केले.
कवयित्रींनी अंतर्मनातील विचार काव्यसंग्रहाच्या माध्यमातून व्यक्त केले आहे असे मत कवी अरूण झगडकर यांनी मांडले.
गझलकार दिलीप पाटील, डॉ.रामटेके यांनीही या काव्यसंग्रहाचे अनुषंगाने समयोचित विचार व्यक्त करून कवयित्रीच्या लेखन कार्यास शुभेच्छा दिल्यात.
प्रास्ताविक कवयित्री जयंती वनकर यांनी केले. या कार्यक्रमात लाडूबाई सोमाजी रायपुरे, लिनता कृष्णाजी जुनघरे (भद्रावती)आणि सुधाबाई खोब्रागडे (गडबोरी) या तिन्ही ज्येष्ठ महिला सामाजिक कार्यकर्त्यांचा शाल व गौरव चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. पहिल्या सत्राचे सूत्रसंचालन कवयित्री सीमा भसारकर यांनी केले तर आभार प्रदर्शन कवयित्री शितल कर्णेवार यांनी केले.
प्रकाशन सोहळ्यानिमित्त आयोजित निमंत्रितांच्या कवी संमेलनाचे अध्यक्ष जेष्ठ कवयित्री अर्जुमन शेख तर प्रमुख अतिथी कवी पंडित लोंढे हे होते. तब्बल पंचवीस कवींनी बहारदार रचना सादर करून उपस्थितांची मने जिंकली.कवी संमेलनाचे सूत्रसंचालन कवयित्री आरती रोडे यांनी केले तर आभार सुरज दहागावकर यांनी मानले.