दिनेश मंडपे
कार्यकारी संपादक
नागपूर: मानवाचे शरीर हे नश्वर आहे. हेच जीवनाचे अखेर सत्य आहे, अशी तथागत बुद्धांची शिकवण आहे. जीवनाचे हे सार ओळखून आपले शरीर कुणाच्या कामात यावे किंवा शरीरापासून संशोधनास मदत व्हावी, हेच ध्येय मनाशी ठरवून दिघोरी रतनसुत्त बुद्ध विहारात तब्बल 25 व्यक्तींनी मरणोत्तर देहदानाचा संकल्प केला.
अनुसयाबाई दशरतराव बांबोडे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ, इक्वलिटी कल्चर इन्स्टिट्यूट, रतनसुत्त बुद्ध विहार येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी विचार मंचावर नागपूर शासकीय वैद्यकिय महाविद्यालयातील शरीररचना शास्त्र विभागाचे विभागप्रमुख प्रा.डॉ. अरुण कसोटे, डॉ.कांचन वानखेडे, डॉ.अविनाश गावंडे, बहार फाउंडेशनचे संचालक डॉ.अशोक उरकुडे, प्रदीप बांबोडे तसेच देविदास बांबोडे उपस्थित होते. यावेळी मंचावर सर्व पाहुण्यांना बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ भेट देण्यात आला.
मरावे परि कीर्तीरुपी उरावे’ अशी मराठीत एक म्हण आहे. जिवंतपणी माणूस समाजाच्या कामी येत असतोच; पण मृत्यूनंतरही तो उपयोगी पडू शकतो, हे आधुनिक विज्ञानाने सिद्ध केले आहे. योग्य प्रमाणात अवयवदान होत नसल्याने आजही कित्येक जण हे विविध अवयवांच्या प्रतीक्षेत आहेत. मृतदेह जाळून नदी किंवा तलावात राख विसर्जन करण्यात येते. यामुळे जलप्रदूषण होते. ते टाळण्यासाठी देहदान उत्तम पर्याय आहे. मरणोत्तर अवयवदानामुळे अन्य कोणीतरी हे सुंदर जग पाहू शकेल, या भावनेतून दिघोरी येथील रतनसुत्त बुद्ध विहारात अनेकांनी देहदानाचा संकल्प केला.
कार्यक्रमाचे संचालन पंकज पाटील यांनी केले तर आभार दर्शना मेश्राम यांनी मानले. या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी दिघोरी उपासिका संघाच्या अध्यक्षा निता डोंगरे, सचिव लता तायडे यांनी अथक परिश्रम घेतले. याप्रसंगी धम्म प्रशिक्षक प्रा. सुभाष शेंडे, समता सेवा संघाचे सचिव पुरुषोत्तम गजभिये, प्रबुद्ध युवक मंडळाचे अध्यक्ष मुकेश ढोक, संघटनेचे पदाधिकारी सक्रिय पदाधिकारी किशोर उके प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच रंजू रंगारी, प्रियांका नागदेवते, वर्षा नीतनवरे, पुष्पा बनकर, भारती सोंडवले, कमल चौधरी, इतर नागरिक उपस्थित होते.