चंद्रपूर : जिल्ह्यात नैसर्गिक पूरपरिस्थिती कमी उद्भवत असून वेकोलीमुळे कृत्रिम पूरपरीस्थितीती निर्माण होत आहे. त्यामुळे वेकोलिच्या ओव्हर बर्डनमुळे वरोरा – भद्रावती सह अन्य ठिकाणी मोठ्या प्रमाणात पूरपरिस्थितीमुळे शेतपिक वाहून गेले आहे. शेतकऱ्यांचे यात आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे ओव्हर बर्डनमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झालेल्यांना १ लाख रुपये एकरी वेकोलिकडून मदत द्या तसेच पांदण रस्त्याकरिता ओव्हर बर्डन चे मटेरिअल वापरण्याची परवानगी द्या अशी लोकोपयोगी मागणी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्याकडे केली आहे. आज जिल्हाधिकारी यांच्या दालनात बैठक घेतली. त्यावेळी विविध विषयावर चर्चा करण्यात आली. यावेळी भद्रावतीचे तहसीलदार अनिकेत सोनवणे देखील उपस्थित होते.
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोळसा खाणी आहेत. परंतु जिल्ह्याच्या विकासाकरिता वरदान असलेल्या तरी शेतकरी बांधवांकरिता ह्या खाणी शाप ठरत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. वेकोलिकडे प्रशासनाचे लक्ष नसल्यामुळे वेकोलि कुठेही ओव्हर बर्डनची साठवणूक करीत असतात. या ओव्हर बर्डनमुळे नदी नाल्यांच्या नैसर्गिक प्रवाहात देखील बदल झाला आहे. हा देखील गंभीर विषय असून नदी नाल्यांचे नैसर्गिक प्रवाह बदलल्यामुळे कठोर कारवाई झाली पाहिजे. त्यामुळे जास्त पाऊस आल्याने शेतीतील पिके देखील वाहून जातात. त्यामुळे लाखो रुपयांचे पीक शेतकऱ्यांचे वाहून जातात. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे ओव्हर बर्डन मुळे पिके वाहून गेलेली आहेत. अश्या शेतकऱ्यांना तात्काळ वेकोलिकडून १ लाख रुपये निधीची मदत करण्याची लोकहितकारी मागणी आमदार धानोरकर यांनी केली आहे.
*खनिज विकास निधी तात्काळ दिला नाहीतर, वरोरा – भद्रावतीतील वाहतूक बंद करू : आमदार प्रतिभाताई धानोरकर*
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील प्रमुख व गौण खनिजांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी प्राप्त होतो. हा निधी खनिजांमुळे प्रत्यक्ष बाधित व इतर बाधित क्षेत्रांतील विकास कामांवर नियमीत खर्च झाला पाहिजे. जिल्हा खनिज प्रतिष्ठानद्वारे खनिज क्षेत्र कल्याण निधी अंतर्गत 2019-20 मध्ये 444 कामांवर 112.97 करोड, 2020-21 मध्ये 1242 कामांवर 171.85 करोड तर 2021-22 मध्ये 294 कामांवर 61.53 करोड रुपये खर्च करण्यात आले. मात्र त्यानंतर 2022-23 व चालू वर्षी म्हणजेच 2023-24 मध्ये प्रत्यक्ष बाधीत व इतर बाधित क्षेत्रात खनिज विकास निधीतून एकाही विकास कामाला प्रशासकीय मंजूरी देण्यात आलेली नाही. खनिज विकास निधी अंतर्गत सद्यास्थितीत 1080 करोड रुपयांचे प्रस्ताव मंजूरीसाठी धूळ खात पडून आहेत तर सुमारे 550 करोडचा निधी जमा आहे. हा निधी खनिज विकास निधीच्या दिशानिर्देशाप्रमाणे त्वरीत खर्च झाला पाहिजे. विविध खनिजांच्या प्रदूषणामुळे परिसरातील नागरीक मोठ्याा प्रमाणात बाधीत होत असतात, अशा स्थितीत हा निधी विनाकारण अडवून ठेवण्यात आला आहे. त्यामुळे हा अन्याय असून खनिज विकास निधी तात्काळ दिला नाहीतर, वरोरा – भद्रावतीतील वाहतूक बंद करू असा इशारा आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी जिल्हाधिकारी विनय गौडा यांना दिला. तात्काळ या निधीचे विकास कामाकरिता वितरण होणार असल्याची ग्वाही यावेळी जिल्हाधिकारी यांनी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांना दिली.