राजुरा :- सिंधी येथील पांदण रस्त्यांची हद्द कायम करण्याकरिता सिंधी येथील उपसरपंच रामभाऊ ढुमणे, मंडळ अधिकारी साळवे साहेब , तलाठी शेंडे, भुमिअभिलेखचे सर्वेअर निब्रड , मंगेश रायपल्ले, राजकुमार दामेलवार भास्कर मोरे, राजु धानोरकर, सुनिल झुरमुरे, पंडित दरेकर, ईश्वर टेकाम आणि पांदन रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या शेतकऱ्यांच्या उपस्थितीत हद्द कायम कायम करण्यात आली.
शेतीला लागणारी यंत्रसामग्री, फर्टीलायजर आणि बी – बियाणे शेतापर्यंत नेणे, शेतकऱ्यांनी पिकविलेला माल घरी आणून बाजारात पोचविणे हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पुढाकार घेऊन येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी शेतरस्त्यांच्या कामाला प्राधान्य देण्याकरिता प्रत्येकाने आपापल्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
दळणवळण सुधारणा ही बाब शेती व ग्रामविकासातील सर्वात महत्त्वाची बाब आहे. या अंतर्गत माती, दगड व मुरूम टाकून कच्चे शेतरस्ते किंवा पाणंद रस्त्यांचे मजबुतीकरण करून एक सफल शेतकरी तयार होणं गरजेचं आहे. रस्त्यांच्या समस्या शेतीत कमी मनुष्यबळाच्या पार्श्वभूमीवर अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरास प्रोत्साहन देण्यात येत आहे. नांगरणी, पेरणी, आंतरमशागत, कापणी, मळणी यासारखी कामे यंत्रांमार्फत मोठ्या प्रमाणात करण्यात येतात. मात्र बारमाही शेतरस्त्यांचा अभाव, अतिक्रमण आणि दुरवस्थेमुळे शेतापर्यंत यंत्रसामग्री पोचविण्यात अडचणी येतात. त्याचप्रमाणे तयार झालेला माल बाजारपेठेपर्यंत नेण्यातही अडथळा निर्माण होतो. प्रामुख्याने पावसाळ्यात शिवारांमध्ये पाणी साठणे व चिखलामुळे वाहतुकीचे काम त्रासदायक होते. यावर मात करण्यासाठी पाणंद रस्ता तयार करणे अनिवार्य आहे. असे आवाहन उपसरपंच रामभाऊ ढुमणे यांनी केले.