ग्रामीण भागातील नागरिकांची शासकीय कार्यालयांमध्ये कामकाजाकरिता दैनंदिन होणारी पायपीट थांबावी या हेतूने महसूल विभागाच्या राज्यस्व अभियानांतर्गत “शासन आपल्या दारी’ अभियान कार्यान्वित करून प्रशासन आणि नागरिक यामधील थेट दुवा असून ह्या अभियानांतर्गत नागरिकांनी आपली अधिकाधिक कामे करून घ्यावी असे आवाहन राज्याचे माजी कॅबिनेट, मंत्री काँग्रेस नेते, आ. विजय वडेट्टीवार यांनी केले. ते सिंदेवाही तालुक्यातील मोहाडी (नले.) येथे आयोजित राजस्व अभियानाअंतर्गत आयोजित”शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाप्रसंगी उद्घाटन म्हणून बोलत होते.
आयोजित कार्यक्रमास उद्घाटक म्हणून राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, काँग्रेस नेते, तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार तर अध्यक्ष म्हणून उपविभागीय अधिकारी महाजन तर प्रमुख अतिथी म्हणून सिंदेवाही तहसीलदार निलीमा रंगारी, नाय तहसीलदार रमेश नेवारे, गटविकास अधिकारी अक्षय सुक्रे, काँग्रेसचे ज्येष्ठ बाबुरावजी गेडाम, अरुण कोलते, तालुका काँग्रेस अध्यक्ष तथा कृउबा समिती सभापती रमाकांत लोधे, उपसभापती दादाजी चौके, वीरेंद्र जयस्वाल, तालुका काँग्रेस उपाध्यक्ष संजय गहाणे, सिंदेवाही नगराध्यक्ष स्वप्निल कावळे, पेठगाव काँग्रेस अध्यक्ष कवठे, काँग्रेस महिला आघाडी तालुका अध्यक्ष सीमा सहारे, मोहाडी सरपंच सीमा नन्नावरे, सचिन नाडमवार प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना माजी मंत्री आ.वडेट्टीवार म्हणाले की, राज्य शासनामार्फत अनेक जनकल्याणकारी योजना कार्यान्वित केलेले आहेत मात्र पश्चिम महाराष्ट्र व मराठवाडा च्या तुलनेत विदर्भातील शेतकरी व ग्रामीण नागरिक यांना योजनांची माहिती योग्यरीत्या मिळत नसल्याने वंचित राहावे लागते. तसेच शेतकरी वर्गाने विविध बदलत्या क्रमाने पिके घेऊन शेतीचा पोत जमिनीची कस सुधारून आपली आर्थिक उन्नती साधावी. तसेच सन 2008 मध्ये राज्यमंत्री असताना वारंवार पाठपुराव्यातून श्रीमती सोनिया गांधी व तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचेकडे विदर्भातील शेतकऱ्यांची व्यथा मांडून 5000 कोटी रुपये मंजूर करून घेत गोसीखुर्द प्रकल्पाची मुहूर्तमेढ केली. त्याचे फलित आता सर्वत्र दिसून येत असून मतदारसंघातील लाखो हेक्टर जमीन ओलिताखाली आलेली आहे तसेच या गोसेखुर्द प्रकल्प मार्फत लाखो शेतकऱ्यांना शेतीला पाणी देण्याची अडचण कायमची दूर झालेली आहे. सोबतच महाविकास आघाडी सरकारमध्ये असताना अनेकांना हक्काची घरे ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थी तथा भोई समाजाकरिता विशेष योजना मार्फत सर्वांगीण विकासासाठी कोट्यावधींचा निधी मंजूर करून दिला. तद्वतच बचत गटांमार्फत कृषी अवजारे, मातोश्री योजनेअंतर्गत पांदण रस्ते, जलजीवन मिशन अंतर्गत शुद्ध पेयजल, सामाजिक सभागृहे, प्रशस्त रस्ते, इ लायब्ररी, शासकीय प्रशस्त इमारती, नागरिकांच्या उत्तम आरोग्य सोयीसाठी रुग्णालयांना नवीन इमारत व रुग्णव्यवस्थेकरिता बेड संखेत वाढ अशा विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या. यावेळी शासन योजनेच्या अनेक लाभार्थ्यांना विविध प्रमाणपत्रे व योजनेचा लाभ देण्यात आला. शासन आपल्या दारी या उपक्रमातून नागरिकांनी विविध विभागाअंतर्गत सुरू असलेल्या योजनांची माहिती घेऊन या योजनांमार्फत लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.