भद्रावती: शहर तथा तालुक्यात गेल्या पाच दिवसांपासून आलेल्या वादळी पावसामुळे शहरातील विजासन भागातील एका भाजीपाला उत्पादकांसोबत तालुक्यातील अन्य भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाल्याने हे भाजीपाला उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक विमांतनेच सापडले आहे. या नुकसानीचा पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शहरातील विजासन भागातील भाजीपाला उत्पादक शेतकरी सुधाकर कुलथे यांनी केली आहे. सुधाकर कुलथे यांची विंजासन परिसरात शेती असून या शेतीत ते मुख्यतः भाजीपाल्याचे उत्पादन घेतात.या भाजीपाला उत्पादनावर त्यांचा व त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. यावेळी त्यांनी आपल्या शेतात मोठ्या प्रमाणात चवळी आणि पालक या भाजीपाल्यासह अन्य भाजीपाल्याची लागवड केली. हा सर्व भाजीपाला प्राथमिक स्थितीत असतानाच शहर तथा तालुक्यात वादळी अवकाळी पावसाने थैमान घातले. या पाच दिवसात आलेल्या मुसळधार पावसाने सुधाकर कुलथे यांच्या शेतातील पालक तथा चवळी या भाजीपाल्याच्या वाफ्यात पाणी साचून हे पीक पाण्यात बुडाल्याने ते सर्व पीक सडून नष्ट झाले. या पिकांपासून त्यांना या हंगामात दोन ते अडीच लक्ष रुपयांची आर्थिक प्राप्ती होईल अशी अपेक्षा होती. मात्र या अवकाळी पावसाने संपूर्ण पीक नष्ट झाल्याने त्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला. या भागाशिवाय तालुक्यात सर्व भागात अवकाळी पावसाने भाजीपाला पिकाचे नुकसान झाले आहे. शासनाने याची दखल घेत नुकसानीचे पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी ,अशी मागणी सुधाकर कुलथे यांनी केली आहे.
अवकाळी पावसाने भाजीपाला पिकाचे नुकसान. आर्थिक मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी.
RELATED ARTICLES