राजुरा : मेघगर्जनेसह विजेचा कडकडाट व सोसाट्याच्या वाऱ्यासह रात्री २ वाजताच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. पंढरपौनी येथील पांडुरंग जेऊरकर यांच्या शेतात शेणखताकरिता व शेत जमिनीची पत सुधरविण्याकरीता सोंडो येथिल महेश दयालवार यांच्या मालकीच्या शेळ्यांचा कळप बसविला होता. मुसळधार पाऊस लागल्याने बकऱ्यांचा कळप पावसापासून आधार घेण्यासाठी झाडाखाली गेल्या होत्या.यात बकऱ्यांवर वीज पडल्याने पंधरा शेळ्यांचा जागीच मृत्यृ झाला. ही घटना (ता.२०) गुरुवारी रात्री २ वाजताच्या सुमारास घडली. रात्रीची वेळ होती. विजेच्या गर्जनेसह मुसळधार पाऊस सुरु होता. ही घटना मालकाच्या डोळ्यांसमोर घडली. विजेसह मुसळधार पाऊस सुरु असल्याने त्यांना काहीच करता आले नाही.सदर घटनेची माहीती सकाळी गावातील नागरिकांना, तलाठी व पोलीस स्टेशनला देण्यात आली.याची माहीती मिळताच तलाठी, पशु वैद्यकीय अधिकारी व पोलीस पाटील यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. घटनेचा पंचनामा करण्यात आला. यामध्ये मेंढपाळ महेश दयालवार यांचे साठ ते सत्तर हजार रुपयाचे नुकसान झाले असून शासनाकडे भरपाईची मागणी केली आहे.