- राजुरा: ओबीसी बद्दल देशात अनेक गैरसमज जाणीवपुर्वक निर्माण करण्यात आले आहेत. वास्तविक विद्वत्ता आणि कष्टाला सन्मान देणारे लढवय्ये ओबीसी असून बहुतांश राजकिय पक्षांनी संकुचित राजकारण करीत त्यांचे खच्चीकरण करण्यात धन्यता मानली. महात्मा फुले या ओबीसीच्या ख-या नेत्याने मार्ग दाखविला मात्र त्यांचे प्रगल्भ विचार संकुचित करण्यात आले. आता ओबीसींचा श्रमाला सन्मान देणार्या संस्कृतीचा जाज्वल्य इतिहासावर दृष्टिक्षेप टाकत स्वतःची राजकिय व्यवस्था उदयास आणल्यास ओबीसींचे भवितव्य दैदीप्यमान होईल, असे प्रतिपादन नाशिक येथील साहित्यिक व जेष्ठ ओबीसी नेते श्रावण देवरे यांनी केले.
राजुरा येथील जगद्गुरू तुकोबाराया सार्वजनीक वाचनालय येथे आयोजित महात्मा फुले आणि डॉ.आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित संयुक्त कार्यक्रमात श्रावण देवरे बोलत होते. अध्यक्षस्थानी दत्तात्रेय मोरे होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन किरण ढुमणे यांनी केले. प्रमुख अतिथी गोरक्षनाथ आखाडे, शोभा देवरे, लक्ष्मण घुगुल, विजय मोरे, नंदकिशोर वाढई, ज्ञानेश्वर शिरसाट इत्यादी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
अध्यक्षस्थानाहून बोलतांना दत्तात्रय मोरे यांनी ओबीसी चळवळीच्या विविध प्रवाहाचा वेध घेऊन आता प्रत्यक्ष कृतीची गरज असल्याचे सांगितले. गोरक्षनाथ आखाडे यांनी राज्यातील ओबीसी चळवळीचा आढावा घेत प्रभावी सुचना केल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिनेश पारखी, संचालन मधुकर डांगे व आभार प्रदर्शन संभाजी साळवे यांनी केले. जिजाऊ वंदना दिनेश पारखी व संभाजी साळवे यांनी सादर केली. भोजनव्यवस्था मधुकर तुर्के यांच्या सहयोगाने करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जगदीश पिंगे, दिलीप गिरसावळे, लक्ष्मण तुराणकर, सुधीर झाडे, विनोद बोबडे, मधुकर मटाले, राकेश देवाळकर, बाबुराव झटाले, बाबुराव मुसळे, ॲड.मारोती कुरवटकर, पुंडलिक वाढई, अमोल राऊत, प्रणित झाडे, धर्मु नगराळे यांनी सहकार्य केले.